पिंपळे गुरव – दिवाळी सणानिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठा, रस्त्यांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. यामध्ये कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी तसेच नागरिकांच्या संरक्षणासाठी पिंपळे गुरव परिसरात सांगवी पोलीस दोन दिवसांपासून कार्यरत आहेत. तसेच रस्त्यांवर नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर देखील वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात मंगळवारी रात्री सात ते आठच्या सुमारास सांगवी पोलिसांचा फौज फाटा भर चौकात दिसून आला. गेल्या दोन वर्षांपूर्वी करोनाकाळात असे दृश्य पाहिले होते. मात्र, या वेळी सांगवी पोलीस भर चौकात रस्त्यावर उतरून नागरिकांची सुरक्षितता बाळगत असल्याचे पहावयास मिळाले. त्याचप्रमाणे वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना दिसून आले. कारवाई करीत असताना सांगवी वाहतूक पोलिसांची तसेच दामिनी पथकाची मदत घेत दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीट, चारचाकी वाहनांवर काळी फिल्म, बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करीत होते. या वेळी वाहनांची कडक तपासणी देखील करण्यात येत होती. यामध्ये दोन्ही बाजूची नंबर प्लेट, वाहनांचे कागदपत्रे, लायसन, वाहन ज्या नावाने आहे तो स्वतः चालवीत आहे का आदी तपासणी पोलिसांकडून कसून करण्यात येत होती. त्यामुळे या चौकातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले होते. अनेक जण पोलिसांना पाहून चौकाच्या अलीकडूनच पळ काढत असल्याचेही दिसून आले.
या वेळी भर चौकात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी, विक्रेत्यांनी, व्यावसायिकांनी सांगवी पोलिसांचे आभार मानले. आभार यासाठी मानले की अनेकदा सणासुदीच्या काळात अपघात, चैन साखळी चोरी, दहशत होऊ नये तसेच पोलीस स्वतः आमच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आम्ही सणासुदीची खरेदीविक्री कोणतीही भीती न बाळगता सुरक्षितरित्या करीत आहोत. शहर जसे स्मार्ट झाले आहे. तशीच कायदा सुव्यवस्था ही स्मार्ट होत असल्याचे पहावयास मिळत आहे. असे मत नागरिकांनी याप्रसंगी व्यक्त केले.
सणासुदीच्या काळात आयुक्तांच्या संकल्पनेतून पोलिसांनी पायी चालत रस्त्यावर उतरून पेट्रोलिंग करीत असताना भर चौकात उभे राहून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. यामुळे कोणतीही अनुचित घटना, अपघात, गुन्हेगारी, गैरकृत्य करणाऱ्यांवर आळा बसण्यासाठी नकीच मदत मिळेल. येथील काटेपुरम चौक हा वर्दळीचा भाग आहे. या चौकात दापोडी, कासारवाडी या परिसरातून येणारे वाहन चालक आढळून आल्यास त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसे संशयित आढळल्यास वाहन जप्त करून त्वरित गुन्हा दाखल करण्यात येत आहे. नागरिकांची सुरक्षितता राखणे हेच आमचे सणासुदीच्या काळात कर्तव्य बजावण्याचे काम आहे.
– रामचंद्र घाडगे, सांगवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक