जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये जर एखाद्या खेळाडूला अव्वल कामगिरी करायची असेल तर त्याच्या शालेय जीवनापासूनच त्याच्या क्रीडाक्षेत्रातील गुणवत्तेवर पैलू पाडण्याचे काम महत्त्वपूर्ण असते. भारतीय मानसिकतेत हे पूर्वी बसत नव्हते. आज मात्र शालेय क्रीडाक्षेत्र जे दिसत आहे ते आणखी विस्तारलेले दिसले तरच भारतही जागतिक क्रीडाक्षेत्रात महासत्ता म्हणून पुढे येईल.
जागतिक क्रीडाक्षेत्राचे मानबिंदू ठरलेल्या केवळ परदेशीच नव्हे तर भारतीय खेळाडूंची उदाहरणे आज वेगाने वाढ होत असलेल्या माध्यमांमुळे शालेय, ग्रामीण भागापर्यंत जोमाने पोहोचत आहेत. म्हणूनच सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनीपासून सानिया मिर्झा, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू हे यूथ आयकॉन म्हणून पुढे आले.
ही सगळी उदाहरणे याचसाठी दिली की या सर्व खेळाडूंनी शालेय स्पर्धांमध्ये आपली चुणूक दाखवली व त्यातून विविध संधी मिळवून आज यशाची शिखरे पादाक्रांत केली. भारतीय मानसिकता आधी अभ्यास नंतर जमलं तर खेळ अशी होती, आज त्यात कमालीचा बदल घडलाय. पूर्वी दहावी किंवा बारावीची परीक्षा म्हटल्यावर खेळाडूंचा खेळ बंद व्हायचा.
परिणामी क्रीडा क्षेत्रात ड्रॉप आउटचे प्रमाण जास्त दिसायचे. खेळाडूंचे एक वर्ष क्रीडाक्षेत्रातील सरावातून वाया जायचे व तो खेळाडू धुमकेतूसारखा गायब व्हायचा. आज शालेय स्तरावर असे ड्रॉप आउट फारसे दिसत नाहीत किंबहुना खेळ आणि शिक्षण दोन्हीतही यश मिळवून वाटचाल करणारे खेळाडू घडत आहेत आणि हेच खेळाडू पुढे अफाट प्रगती करत जागतिक क्रीडाक्षेत्रावर मोहोर उमटवत आहेत.
दहा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार याबरोबरच बुद्धिबळ, टेनिस आणि क्रिकेट यांच्या जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटना शालेय क्रीडास्पर्धांबाबत खूपच जागृत झाल्या आहेत. याला आजवर भारतीय संघटना अपवाद होत्या, आज चित्र बदलत आहे मात्र, त्यात आणखी वाढ होणे गरजेचे आहे. देशाची क्रीडानगरी अशी सार्थ ओळख आज आपल्या पुण्याची निर्माण झाली, त्यामुळेच क्रीडा संस्कृती मोठ्या प्रमाणावर रूजली हे कोणीच नाकारणार नाही.
ग्रामीण भागात जागरूकता दिसावी
सोयी-सुविधा किंवा एकूणच क्रीडाक्षेत्रावर असलेला शहरी पगडा थोडा कमी झालाय. मोठा खेळाडू बनण्याची स्वप्न ग्रामीण भागातील खेळाडूही पाहू लागली व पूर्णही करू लागली आहेत. आज महेंद्रसिंग धोनी, ललिता बाबर, तेजस्विनी सावंत, कविता राऊत ही त्याची काही ठळक उदाहरणे. ग्रामीण शाळांना तर जवळपास प्रत्येक गावात मोठमोठी क्रीडांगणे उपलब्ध आहेत. मग केवळ अत्याधुनिक सुविधा जर त्याच सहजतेने मिळाल्या तर ते खेळाडू जागतिक क्रीडा क्षेत्रावर नक्कीच राज्य करतील. मात्र, आज शहरात बहुतांशी मुले क्रिकेट, हॉकी, टेनिस वगैरे खेळ आपल्या मोबाइलवर खेळतात. ग्रामीण भागात अजूनही घाम गाळण्यावर विश्वास ठेवला जातो. हीच जागरुकता आता त्यांच्या क्रीडाक्षेत्रातही दिसली पाहिजे.
लिव्हिंग स्टॅंडर्डचा परिणाम
शहरीकरण वाढते आहे, आयटी क्षेत्र विस्तारले आहे आणि नोकरदार वर्ग तसेच व्यवसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. राहणीमान उंचावले असल्याने आपल्या मुलाचे हट्ट पुरवण्यासाठी प्रत्येक पालक खिसा रिकामा करताना मागे पुढे पाहत नाहीत. दोन दशकांपूर्वी एखाद्या क्रिकेट शिबिरात दर महिना 60 रूपये भरून पाल्याला दाखल करताना नकार देणारे पालक आज मोठमोठ्या क्लबचे लाखो रूपयांचे सदस्यत्व घेत आपल्या मुलाबरोबर स्वतःही मोठी स्वप्नही रंगवताना दिसतात. जुन महिन्यात शाळा सुरू होताना शाळेचा युनिफॉर्म खरेदी करण्याबरोबर पूर्वी रेनकोट, छत्री वगैरे खरेदी केली जायची. आज शालेय क्रीडा साहित्यही खरेदी केले जाते. जशी खेळाडूची प्रगती होईल तशीच ती त्या शाळेचीही प्रगती ठरेल हीच भारतीय क्रीडाक्षेत्रात नव्या युगाची नांदी ठरत आहे.
अन्य खेळांमध्येही विकास
केवळ क्रिकेटच नव्हे तर आज स्केटींग, जलतरण, मार्शल आर्ट, हॉकी, फुटबॉल, नेमबाजी, टेनिस, टेबल-टेनिस, बॅडमिंटन या खेळांकडेही मुले जास्त आकर्षित होताना दिसतात, याला कारण या खेळांच्या सुविधा, मैदाने बऱ्याच प्रमाणात वाढत आहेत. खिशाला सहज परवडेल इतक्या किंमतीत सध्या क्रीडा साहित्यही उपलबध होत आहे. जगातला कोणताही ब्रॅंड तुम्हाला देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात उपलब्ध होत आहे.
हे कमी म्हणून ऑनलाइन विक्रीतूनही पाहिजे ते क्रीडा साहित्य खरेदी करता येऊ शकते ते देखील अगदी घरपोच. आमच्या लहानपणी जेव्हा आमच्या शाळेच्या क्रीडा शिक्षकांकडे फुटबॉलची किंवा क्रिकेटच्या बॉलची मागणी करायचो तेव्हा स्वतःची मालमत्ता विकून तुम्हाला हे साहित्य देतोय असा शिक्षकांचा अविर्भाव असायचा. क्रीडा शिक्षक हे पद पूर्वी शालेय स्तरावर शाळा चालकांनी घडवलेला विनोद असायचा. ठराविक शाळा वगळता ज्यांना विषय शिकवण्यात रस नाही त्यांना क्रीडा शिक्षक करायचे का? अशी शंका त्यावेळी यायची.
शालेय स्तरावरच खेळाडूंची खरी कर्तबगारी समोर येते. त्यांची या स्तरावर झालेली कामगिरी कायम राहिली तरच तो खेळाडू जिल्हा, राज्य, राष्ट्रीय अशा पायऱ्या चढून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतो. जर त्याच्या शालेय कामगिरीबाबत गांभीर्य ठेवले गेले तरच त्याच्या कामगिरीला आंतरराष्ट्रीय स्तरावर गांभीर्याने घेतले जाईल.
शाळा वाढल्या, संधीही वाढल्या
सध्या आंतरराष्ट्रीय लर्निंग स्कूलच्या जमान्यात प्रस्थापित शाळांबरोबरच एकूणच शाळांची संख्या वाढली आणि परिणामी खेळाडूंसाठी संधीही वाढल्या. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या जोडीने कारकिर्दीची सुरुवात शालेय क्रिकेट स्पर्धेतील विक्रमी भागदारीनेच केली. शालेय स्पर्धांचे महत्त्व किती आहे याचे हे बोलके उदाहरण आहे. अर्थात त्यांना द्रोणाचार्य रमाकांत आचरेकरांसारखे गुरू भेटले हे त्यांचे नशिब. असेच गुरू प्रत्येक पाल्याला शालेय वयातच मिळाले तर तो खेळाडू कधीच अपयशी ठरणार नाही. पालकांनीही मुलांना थोडे समजून गेतले व त्यांच्यातील खेळाला न्याय दिला तरच ते पुढे जाऊन नव्या पिढीसाठी प्रेरणास्रोत बनतील. त्यांच्या शिक्षणाला महत्त्व देऊ नका असे अजिबात म्हणायचे नाही परंतु त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील गुणवत्तेला मारू नका इतकेच सांगणे आहे.
आपल्याकडे हे ज्या दिवशी घडेल त्यादिवशी सर्व क्रीडाप्रकारत आपल्याला सर्वोत्तम खेळाडू गवसतील. हिरा जरी बेढब अवस्थेत खाणींमध्ये सापडत असला तरी त्याला ओळखण्यासाठी जसा रत्नपारखी गरजेचा असतो तसाच पैलू पाडण्यासाठी कारागीरही निष्णातच लागतो. प्रत्येक पालकांनी, प्रशिक्षकांनी आपलेच घोडे पुढे दामटण्यापेक्षा खेळाडूची आवड लक्षात घेऊन त्या खेळातील कामगिरीसाठी त्याला प्रोत्साहन दिले तरच तो खेळाडू लंबी रेस का घोडा होईल. शालेय क्रीडा क्षेत्र विस्तारले तरच लहान वयापासून मुलांना खेळाची गोडी लागेल व त्यातूनच उद्याचे महान खेळाडू नावारुपाला आलेले दिसतील.
सुविधाही गरजेच्याच
शहरी भागांमध्ये मुलांना सगळ्याच सुविधा उपलब्ध असतात, तशा ग्रामीण बागात असतातच असे नाही. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), खेलो इंडिया, टार्गेट ऑलिम्पिक पोडीयम (टॉप्स) सारख्या योजना केवळ शहरी भागांपूरत्याच मर्यादित राहू नयेत त्याची व्याप्तीही वाढली पाहिजे. या योजनेत शालेय स्तरावरील खेळाडूंच्या कामगिरीचाही विचार केला गेला पाहिजे. यातील एखाद्या खेळाडूवर मेहनत घेतली तरच तो उद्याचा ऑलिम्पिक पदक विजेता ठरेल यात शंका नाही. मात्र, सुविधा केवळ प्रत्येक शाळेकडे मैदान असेल म्हणजे झाले असे होत नाही. त्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही प्रोत्साहन देत शाळांकडे अद्ययावत क्रीडा साहित्य असेल याची काळजी घेतली पाहिजे. त्यात काळानुसार बदल व वाढही केली गेली पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय स्कूल गेम्सला प्रोत्साहन दिले पाहिजे.
स्कूल गेम्सची अन्य देशांतील स्थिती पाहिली तर आपल्याकडे केवळ औपचारिकताच पार पाडली जाते अशी शंका येते. काही शाळा दरवर्षी स्पर्धा घेतात, त्याची वृत्तेही माध्यमांमध्ये प्रकाशित होतात, त्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक तसेच अन्य काही जणांचे खेळाडूंसह फोटोही छापून येतात मात्र, त्या खेळाडूंचे पुढे काय झाले, त्यांची किती प्रगती झाली याचा लेखाजोखा कोणाकडेही नसतो किंबहुना तो ठेवावा याची काळजीही या शाळा किंवा संबंधित व्यक्ती घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. यात बदल झालाच पाहिजे व शालेय क्रीडाक्षेत्र विस्तारलेलेच नव्हे तर प्रगतीपथावरही दिसले पाहिजे.
अमित डोंगरे