प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 22 – पुणे जिल्ह्यात औद्योगिकीकरणाचा वेग वाढत आहे. जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्यात संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असा निर्धार पुणे ग्रामीण पोलीस दलाचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
पोलीस अधीक्षकाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यात औद्योगिकीकरणाचा वेग वाढत आहे. मोठ्या संख्येने बाहेरील जिल्हा तसेच परप्रांतातून नागरिक रोजगाराच्या शोधात येत आहेत. औद्योगिक पट्ट्यात संघटित गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत.
या टोळ्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात तातडीने दोषारोपत्र दाखल करणे तसेच आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा कशी होईल, यादृष्टीने तपास करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्याचा विस्तार वाढत आहे. शहरीकरणामुळे जिल्ह्यातील वाहतुकीची समस्या वाढत आहे. वाहतुकीचे व्यवस्थापन करणे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील समस्या विचारात घेऊन यापुढील काळात काम करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले.