नवी दिल्ली – दिल्लीत सप्टेबरच्या दुसऱ्या आठवड्यात जी- 20 परिषद होणार आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने आठ ते दहा सप्टेंबर या कालावधीत दिल्लीतील सर्व रिटेल स्टोअर, हॉटेल, रेस्टॉरंट बॅंका वित्तीय संस्था, वाणिज्य संस्था बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. सरकारने या निर्णयावर फेरविचार करावा अशी सूचना रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने दिल्ली सरकारला केली आहे.
या कालावधीत रिटेल स्टोअर, मॉल, रेस्टॉरंट बंद झाल्यानंतर यामुळे एक तर रिटेल व्यवसायाचे नुकसान होईल, त्याचबरोबर भारत भेटीवर असलेल्या पाहुण्यांना दिल्लीला भेट देता येणार नाही असे या संघटनेने म्हटले आहे. दिल्लीला भेट देणाऱ्या पाहुण्यांना दिल्लीत हॉटेलमध्ये खाता येणार नाही. त्यांना खरेदी करता येणार नाही. दिल्लीत येणारे पाहुणे दिल्लीत हॉटेलला भेट देऊन खरेदी करीत असतात. या बाबीकडे या संघटनेने लक्ष वेधले आहे.
या संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी सांगितले की, दिल्ली संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे येथील खरेदी आणि खाणे -पिणे असते. त्यामुळे परदेशी पाहुण्यांना दिल्लीला खऱ्या अर्थाने भेट दिल्याचे सुख मिळणार नाही. त्यामुळे काही प्रमाणात तरी व्यवहार करण्यास रिटेल इंडस्ट्रीला परवानगी मिळण्याची गरज आहे.
दिल्लीतील रिटेल व्यावसायिकांचे आणि कर्मचाऱ्यांचे या तीन दिवसाच्या बंदमुळे नुकसान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेक इन इंडियाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या वस्तू या कालावधीत परदेशी पाहुण्यांना विकल्यानंतर त्यांचा ब्रॅंड बनण्यास मदत मिळणार आहे. बंदमुळे काहीच करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी जी -20 परीषद होणार आहे त्या भागातील दुकाने बंद ठेवण्यास हरकत नाही. मात्र संपूर्ण दिल्लीतील दुकाने बंद ठेवणे योग्य होणार नाही असे ते म्हणाले.
मोदी यांच्याकडून दिलगीरी
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या विषयावर भाष्य केले होते. जगातील मोठ्या देशाचे 20 प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी दिल्लीला आठ ते दहा सप्टेंबर रोजी भेट देणार आहेत. त्यामुळे दिल्लीतील वाहतूक आणि इतर कामकाजावर परिणाम होणार आहे. या परिषदेला मदत व्हावी यासाठी दिल्लीकरांनी काही दिवस त्रास सहन करावा असे आवाहन मोदी यांनी केले होते. यामुळे दिल्लीकरांचे गैरसोय होणार आहे याचा आपल्याला अंदाज आहे. आपण सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत आहोत असेही पंतप्रधानांनी सांगितले होते.