वडूज, (प्रतिनिधी) – सैन्य भरती होवून देशसेवा करणे ही भाग्याची गोष्ट आहे. मात्र एखाद्या जवानाचा ऐन तारुण्यात मृत्यु झाला तर त्याच्या जोडीदाराला होणारे दु:ख न सोसण्यासारखे असते. त्या पत्नीला आयुष्यभर दु:ख सोसावे लागते. अशा वीरपत्नीबद्दल तसेच कुटुंबीयांबद्दल समाजाने आदर बाळगला पाहिजे. असे मत जालना येथील भागवताचार्य ह.भ.प. सुनील गाडेकर यांनी व्यक्त केले.
वडूज येथील शहीद जवान मयूर जयंत यादव यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वीरजवान मयूर यादव ज्या रेजिमेंटमध्ये काम करत होते. त्या 145 एल.टी.ए.डी. रेजिमेंटचे एस.पी. शौयचक्र विजेते कर्नल अभिषेक चक्रवर्ती यांनी नायब सुभेदार देवीदास भिसे यांच्याजवळ मयुरची प्रतिमा असलेले तैलचित्र भेट दिले.
ह.भ.प. गाडेकर म्हणाले, भारतीय जवान ऊन, वारा, पाऊस, वादळ, वारे याची तमा न बाळगता सीमेवर अहोरात्र पहारा करत असतात म्हणून देशातली जनता सुखी आहे. सैनिकांना दररोज वेगवेगळ्या समस्येला सामोरे जावे लागते. कधी कधी मृत्युही पत्करावा लागतो. सैन्य सेवा करत असताना झालेला मृत्यू ही कुटुंबीय व देशासाठी अभिमानास्पद बाब आहे.
परंतू जिच्या पतीला वीरमरन येते. त्या पत्नीला आयुष्यभर दु:ख सोसावे लागते. अशा वीरपत्नीबद्दल तसेच कुटुंबीयांना ज्या ठिकाणी मदत, सहकार्य अपेक्षीत असेल त्यावेळी प्रत्येक प्रसंगात धावून जाणे गरजेचे आहे. मयुरच्या वीरमरणाने वडूज गावाचा नावलौकीक संबंध देशभर वाढला आहे.
यावेळी जयहिंद प्रतिष्ठानच्या विजया फडतरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख, राष्ट्रवादीच्या नेत्या अनुराधा देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा. बंडा गोडसे, नगराध्यक्षा सौ. मनिषा काळे, डॉ. संतोष गोडसे, पृथ्वीराज गोडसे, शहाजी राजे गोडसे, विजयराव शिंदे, प्रदीप शेटे, राजेंद्र देशमुख, सोमनाथ जाधव, नीलेश गोडसे, परेश जाधव, तानाजी वायदंडे,
ओंकार चव्हाण, डॉ. महेश माने, अॅड. राजीव चव्हाण, महंमदशरीफ आत्तार, अजित नलावडे, गोरख काळे, विजय कुलकर्णी, हेमंत गोडसे, सुभाष गुरव, सुनील क्षीरसागर, भारती जाधव, वीरपत्नी श्रीमती राधिका यादव, पिता जयंत यादव, आई मंगल यादव, बंधू हर्षद यादव तसेच ग्रामस्थ, महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले.