पुरंदर तालुक्यात महावितरणचा भोंगळ कारभार थांबेना
सासवड – सर्वासामान्य शेतकरी, नागरिकांची कामे करता येत नसतील तर राजीनामा द्या. तसेच महावितरण बंद करून सौर पॅनल बसविणे आणि खासगी विद्युत व्यवस्था केलेली चांगली असेही नाईलाजाने पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांना म्हणावे लागले.
गेल्या वर्षभरापासून पुरंदर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना महावितरणच्या भोंगळ कारभार आणि अधिकऱ्यांच्या मनमानीच्या धोरणामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सोमवारी (दि. 26) महावितरण बाबत पारगाव, आंबोडी येथील शेतकऱ्यांसोबत बैठक झाली. यामध्ये परिसरातीलही अनके गावांतील नागरीकांनी महावितरणच्या अकार्यक्षम आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार, अरेरावीचा पाढा वाचला, त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आमदार जगताप यांनी बोलवून घेत फैलावर घेतले.
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पुरंदरच्या पूर्व भागातील सुमारे दीड लाख टन ऊस जळाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना उशीरा विजबील देऊन दंड आकारला जातोय, सिंगल फेज वेळीही वारंवार विजपुरवठा खंडीत, लोडशेडींग आणि कमी दाब अशा अडचणींना नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. मात्र व्यावसायिकांना त्वरीत विजजोड देऊन त्यांच्या बिलांचा भर सर्वसामान्य नागरिकांवर टाकला जात आहे.
चोर सोडून सर्वसामान्यांना त्रास देण्याचे काम अधिकाऱ्यांकडून होते असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. एकंदरीत महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांसह जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच महावितरण संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचेही आमदार संजय जगताप यांनी सांगितले. याप्रसंगी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, महिलाध्यक्षा सुनिता कोलते, नंदकुमार जगताप, संभाजी काळाणे, विठ्ठल मोकाशी, पुष्पाआक्का कदम आदी उपस्थित होते.
3 जुलै रोजी जनआंदोलन
पुरंदर तालुक्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, अरेरावीचे धोरण, अकार्यक्षमता याच्या विरोधात दि. 3 जुलै रोजी सासवड येथील महावितरणच्या कार्यालयावर जनआंदोलन करून उपोषणाला बसणार असल्याची माहिती पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सोमवारी (दि. 26) पत्रकार परिषदेत दिली.
महाजन, गोरेंवर कारवाई करणार
महावितरणचे सासवड येथील सहाय्यक अभियंता गणेश गोरे आणि दिवे येथील सहायक अभियंता चंद्रशेखर महाजन यांच्या अरेरावीच्या तक्रारी असून या दोघांकडून सर्वसामान्य नागरीक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यापेक्षा त्रास देण्याचेच काम अधिक होत असून या दोघांवर कारवाई करणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.
सर्वसामान्य जनता वाऱ्यावर
आंबोडी येथील मागासवर्गीय वस्ती गोल्या 2 वर्षांपासून डीपीच्या प्रतिक्षेत आहे; मात्र याठीकाणी डीपी न बसविता जवळील हॉटेलसाठी अनके खांब टाकून तातडीने डीपी बसवून वीजजोड दिल्याचा प्रकार निदर्शनास आला असून महावितरणचे अधिकारी व्यावसायिकांचे धार्जिणे असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे आमदार जगताप म्हणाले.