पिंपरी, (प्रतिनिधी) – महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आटवले गट) ला लोकसभा निवडणुकीकरिता एकही जागा न सोडल्याने राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरातील शिरूर व माळ लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचे काम न करण्याचा इशारा स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्यास स्वत: रामदास आठवले इच्छुक आहेत. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्यासाठी सोलापूरची जागा सोडण्याची मागणी ’आरपीआय’चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपकडे केली आहे. ती मान्य झाली नसल्याचे चित्र आहे. रामदास आठवले यांचा राज्यसभेचा दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. हेच कारण देत भाजप त्यांना लोकसभेची जागा देणार नसल्याचे समजते.
लोकसभेच्या रणांगणातआरपीआयला एकही जागा मिळण्याची शक्यता नसल्याने पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे दोन माजी शहराध्यक्ष आक्रमक झाले आहेत. त्यातील स्वप्नील कांबळे यांनी मागितलेल्या वरील दोन जागा सोडल्या नाही, तर मावळ आणि शिरुर या दोन लोकसभा मतदारसंघात काम करणार नाही, असा इशारा दिला आहे. शिर्डीचा मतदारसंघ दिलाच पाहिजे, अन्यथा मावळ आणि शिरुरमध्ये नोटाला मतदान करू,असा इशारा दुसरे माजी शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी दिला आहे.
सकारात्मक घडामोडी अपेक्षित
खासदार रामदास आठवले यांच्या मागणीचा विचार करून, या दोन्ही जागांकरिता पक्षाचे कार्यकर्ते आग्रही आहेत. त्यामुळे आठवले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली. या चर्चेमधून आरपीआयच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी पदाधिकार्यांची आग्रही मागणी आहे. अन्यथा आरपीआयला डावलल्यामुळे देशात वेगळा संदेश जाण्याची शक्यता वर्तविली आहे.