पुणे : शहरातील बेघरांना दोन घास जेवण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य पुणेकर झटत असतानाच ; दुसऱ्या बाजूला या पुणेकरांच्या चांगूलपणावर पाणी फेरण्याचे काम काही राजकीय प्रतिनिधी करत आहेत.
या बेघरांना निवाऱ्यासाठी पालिकेने नाईट शेल्टर आणि पालिकेच्या शाळा मध्ये सुविधा करताच संबधित भागातील काही लोकप्रतिनिधी आणि नागरिक या बेघरांना आपल्या परिसरात ठेऊ नयेत म्हणून पालिका प्रशासनावर दबाव आणत आहेत. हे रस्त्यावरचे नागरिक असल्याने त्यांच्यामुळे आमच्या भागात करोनाचे रुग्ण वाढतील असा अनाठायी दावा करत या बेघरांना इथे ठेऊ नये असा धमकीवजा इशारा पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला जात आहे.
शहरात लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने शहरातील बेघरांवर उपासमारीची वेळ आली. हे बेघर आले तरी माणूसच आहेत म्हणून माणुसकीच्या भावनेतून अनेक पुणेकर पोटाला चिमटा घेत आपल्या घरातील जमेल तेवढे अन्न या नागरिकांना देत आहेत तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि काही नगरसेवक या लोकांसाठी पुढे आले असून त्यांच्या जेवणाची जबाबदारी घेत त्यांना फूड पॅकेट वाटत आहेत.
तर या नागरिकांना निवारा देण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पालिकेने आपली नाईट शेल्टर आणि शाळा या बेघरांना देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार सेनादत्त आणि येरवडा परिसरात पालिकेने सुमारे 100 बेघरांना निवारा दिला आहे. मात्र, हा निवारा देताना पालिकेला चांगलाच अडचणींचा सामना करावा लागला. काही आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिकांनी त्यांना ठेवण्यास विरोध केला. हे बेघर आहेत.
रस्त्यावर फिरतात त्यांना आमच्याकडे कशाला आणता त्याची सोय दुसरिकडे करा असा वाद घातला जात आहे. हे लोक रस्त्यावरचे असल्याने त्यांच्यामुळे आमच्या भागात आजार पसरेल अशी भूमिका घेत या बेघरांना निवारा देण्यास विरोध केला जात असल्याचे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे देशावर संकट ओढवले असताना एकमेकांना मदत आणि साथ रोखण्यासाठी सहकार्य करण्या ऐवजी काही पुणेकर मात्र निष्ठुरतेने वागत असल्याने प्रशासनही हवालदिल झाले आहे.