शिरूरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची मागणी
मांडवगण फराटा- भाजप सरकारप्रमाणे महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करू नये. थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेल्या लाभाप्रमाणाचे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळण्याची मागणी शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
भाजप सरकारनेही शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला होता. तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले होते. मात्र, शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील नियमित कर्ज भरणाऱ्या काही शेतकऱ्यांना अनुदानाचाही लाभ मिळाला नाही आणि आता महा विकास आघाडी सरकारनेही पुन्हा थकबाकीदारांनाच कर्जमाफीचा लाभ देऊ केला आहे.
शेतकरी मात्र दरवर्षी मार्च महिन्यात पैशांची जुळवाजुळव करतो, यासाठी प्रसंगी दागिने गहाण ठेवतो, मित्रमंडळी किंवा पाहुण्यांकडून उसने पैसे घेऊन कर्ज भरतो अशा प्रामाणिक शेतकऱ्यांवर गेल्या तीन वर्षांपासून अन्याय होत आला आहे. महा विकास आघाडी सरकारने अद्यापही नियमित कर्ज भरणाऱ्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली नाही. त्यामुळे या सरकारच्या काळात तरी प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, अशा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी आहे.