कोपरगाव – गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी न भरणाऱ्या थकबाकीदारांमुळे तब्बल 16 कोटी रुपये थकबाकी वसुलीचे आव्हान कोपरगाव नगरपालिकेसमोर उभे ठाकले आहे. एका बाजुला कर्जाचा डोंगर पालिकेसमोर असताना कोपरगावकर घरपट्टी व पाणीपट्टी भरत नसल्याने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे.
करोनाचे कारण पुढे करीत काही नागरीकांनी व व्यापाऱ्यांनी जाणुनबुजून थकबाकी भरत नसल्याने अखेर मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी पालिकेच्या सर्व विभागाचे कर्मचारी एकत्र करून थकबाकी वसुलीसाठी तयार केलेले पथक मैदानात उतरले आहेत. वर्षानुवर्षे पालिकेची थकबाकी ठेवून वशिलेबाजी करणाऱ्यावर मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी कायद्याचा बडगा उगारला असून जाणुनबुजून थकबाकी न भरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करुन संबंधिताचे दुकाने सील करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गोसावी यांनी दिली.
कोपरगाव नगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांनी गेल्या अनेक वर्षांपासून घरपट्टी व नळपट्टी न भरल्याने तब्बल 16 कोटीची वसुली बाकी आहे. नागरीकांना योग्य नागरी सुविधा देण्यासाठी उत्पन्न आणि खर्च याचा समतोल साधण्यासाठी वसुली होणे गरजेचे आहे.वसुलीसाठी काहीवेळा कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. हे सर्व जनहितासाठी करीत आहोत, असे मत मुख्याधिकारी गोसावी यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, सध्या 8 कोटी 28 लाख रूपये घरपट्टी थकीत तर 6 कोटी 32 लाखाची पाणीपट्टी आणि व्यवसायिक व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांची थकबाकी 1 कोटी 40 लाख रुपये वसुल होणे बाकी आहे.
एकुण वसुलीपैकी घरपट्टी 33 टक्के व पाणीपट्टी केवळ 25 टक्के वसुल झाल्यामुळे पालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत वसुलीची कारवाई जोरात सुरु करण्यात येईल, जे व्यापारी व थकबाकीदार थकबाकी त्वरीत भरत नसतील त्यांचे दुकाने सील करण्यात येतील. सील करुनही थकबाकी भरली नाही तर संबंधित दुकाने पालिका प्रशासन ताब्यात घेवून त्यांचा फेरलिलाव करुन थकबाकी वसुल करणार आहे. नागरीकांनी पालिकेला कटु निर्णय घेण्यास भाग पाडु नये.
पालिका प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन गोसावी यांनी केले. दरम्यान, कोपरगाव नगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांच्या नावे संबंधित प्रभागातील वसुली करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करताना त्यांना लेखी स्वरुपात थकबाकीचे पत्र दिले आहे. कोपरगाव पालिका आर्थिक अडचणीत येवून विकास कामाला अडथळा होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावे अशी विनंती मुख्याधिकारी गोसावी यांनी केली.