पुणे – राज्यातील 165 आश्रमशाळांना 20 टक्के अनुदान सुरू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आश्रमशाळांना करोना काळात विविध कागदपत्रांची जमवाजमव करून ती सादर करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
2019-20 या वर्षापासून आश्रमशाळांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी पात्र आश्रमशाळांची विशेष पथकामार्फत पूर्वी तपासणीही झाली. शाळांकडून कागदपत्रांबाबतची हमी पत्र घेण्यात आली होती. आता अनुदान मिळविण्यापूर्वी शाळांना प्रत्यक्षात कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. समाजकल्याण आयुक्तालयामार्फत त्याबाबत संबंधित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांना पत्रेही पाठवली आहेत. काही शाळांनी कागदपत्रे सादर केली आहे. मात्र, अद्यापही काहींकडून ती सादर केलेली नाहीत.
आश्रमशाळांना बिंदू नामावली, संच मान्यता, वैयक्तिक मान्यता ही सादर करणे आवश्यक आहे. निवासी, अनिवासी विद्यार्थ्यांचा नाव, वर्ग, जात, आधार कार्ड, जन्म तारीख याबाबतचा गोषवाराही सादर करावा लागणार आहे. आधार कार्ड माहिती खरी असल्याबाबत मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र, प्रवेश निर्गम उतारा रजिस्टर साक्षांकित प्रत, कर्मचारी यादी पदनिहाय, मागील संच मान्यता आदेशाची प्रत, शाळा मान्यता शासन निर्णयाची प्रत, बायोमॅट्रिक उपस्थिती प्रत, बिंदू नामावली रजिस्टर वर्ग खोल्या असल्याबाबतचे प्रमाणपत्र, अधिकारी भेट रजिस्टरची प्रत आदी कागदपत्रे सादर करावयाची आहेत.
शाळा अद्यापही बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डच्या माहितीची जमवाजमव करणे कठीण आहे. आधार कार्ड काढण्याची केंद्रे बंद असल्याने काही विद्यार्थ्यांना अद्यापही आधार कार्ड काढता आलेली नाहीत. अनुदानाचा फायदा होणाऱ्या संबंधिक शिक्षक, कर्मचाऱ्यांवरच कागदपत्रे जमविण्याची जबाबदारी सोपवल्याने ते हैराण झाले आहेत.