प्रशासन व कंपनी व्यवस्थापनामुळे खेडमध्ये करोनाचे थैमान
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – सरकारी प्रशासनाच्या आणि कंपनी व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळे खेड तालुक्यात करोना थैमान घालत आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता अधिकार्यांनी मनमानी निर्णय घेतल्याने सर्वत्र करोनाबाधितांची संख्या वाढत आहे, अशा शब्दात आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सरकारला एकप्रकारे घराचा आहेर दिला आहे.
तर सरकारी नियम न पाळणार्या एमआयडीसीमधील कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर आता सत्ताधारी आमदारांनीच कान टोचल्याने सरकार काही निर्णय घेणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
आमदारच म्हणतात खरी आकडेवारी मिळत नाही
आर्थिक चक्रे बंद राहू नयेत, यासाठी कंपन्या सुरू करण्यासाठी आम्ही आग्रही राहिलो. कंपन्या सुरू झाल्यावर कंपनी व्यवस्थापनाने खबरदारी घेणे आवश्यक होते. पण ते बेपर्वाईने काम करत आहेत. कंपन्यांना लागू केलेल्या अटी शर्ती त्यांनी पाळलेल्या नाहीत. सोशल डिस्टन्ससह इतर नियम धाब्यावर बसवले. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात आलेल्या सरकारी अधिकार्यांनीही या अटींचे पालन होते आहे की नाही, त्याच्याकडे लक्ष दिले नाही. यामुळे एमआयडीसीत रुग्णाची संख्या वाढत आहे. ती सुद्धा कंपनी प्रशासन लपवत आहे. तालुक्यात खरी आकडेवारी मिळत नाही. अनेक कंपन्यांचे आरोग्य विमा कंपन्यांशी टाईप असल्याने मोठ्या हॉस्पिटमध्ये उपचार करीत कंपन्या आपल्या कामगारांना करोना झाल्यापासून लपवत आहेत, नियम न पाळणार्या आणि माहिती लपविणार्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत.
‘त्याची’ पुरेशी व्यवस्थाच नाही
खेड तालुक्यातील चाकण, आळंदी आणि राजगुरूनगर नगर परिषदेच्या परिसरातील गावांमध्ये करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका आदींची पुरेशी व्यवस्था प्रशासनाला करता आली नाही. अधिकारी स्वतः काही करत नाहीत आणि लोकप्रतिनिधींशीही संवाद ठेवत नाहीत. या अव्यवस्थेमुळे गंभीर रुग्णांना, जीव गमवावा लागण्याच्या घटना तालुक्यात घडत आहेत. यासह रुग्णालये बिलांची भरमसाट आकारणी करीत आहेत आणि अधिकारी झापडबंद बसले आहेत.