मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली असती असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती, त्यावरून फडणवीस सवाल करत आहेत.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबतीत जे विधान केले, त्यापेक्षा हे भयानक विधान आहे. केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना रातोरात अटक करणारे पोलीस आता का गप्प आहेत ? कारवाई का करीत नाहीत ? असा सवाल त्यांनी विचारला आहे,तसेच म्हणून मी म्हणतो सिलेक्टिव्ह काम सुरू आहे. पोलीस विभाग सिलेक्टिव्ह होतो, त्या राज्याची अधोगती झाल्याशिवाय राहात नाही.
मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारीच आहे की देशाच्या पंतप्रधानांना कोणी जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांचे ते कर्तव्यच आहे, उपकार नाहीत असा टालाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
शारीरिक उंची वाढल्यामुळे बौद्धिक उंची वाढते असे नाही. हे नाना पटोले यांनी दाखवून दिले. कॉंग्रेस नेत्यांच्या मनात मोदीजींबद्दल असूया आहे हे दिसते. पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवणे, त्यानंतर नाना पटोले यांचे विधान अशा प्रकारचे विचार लोकशाहीला घातक आहेत.
अशी टीका फडणवीसांनी केली. तर मला एका घटनेचे आश्चर्य वाटते, पण मी समर्थन करीत नाही की आमच्या एका कार्यकर्त्याने मुखमंत्र्यांच्या पत्नीला राबडी देवी म्हटले तर मध्यरात्री त्याच्या घरी पोलीस जातात आणि नाना पटोले मी पंतप्रधानांना मारू शकतो अशी थेट धमकी देतात आणि त्यांच्या विरुद्ध साधा एफआयआरही दाखल होत नाही. आता कायदा माणूस बघून चालेल अशी परिस्थिती आली. असेही फडणवीस म्हणाले आहेत.