पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अवघ्या वर्षभरापूर्वी नियुक्त झालेल्या जवळपास १२ कनिष्ठ अभियंत्यांनी (स्थापत्य) महापालिका सेवेचा राजीनामा दिला आहे. यातील जवळपास सर्वांनीच काही वर्षांपूर्वी एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील काही जणांना वर्ग-२ च्या नियुक्त्या मिळाल्या आहेत. तर, महापालिकेचे पद वर्ग ३ चे असल्याने हे अभियंते महापालिकेची सेवा सोडत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
आणखी काही अभियंत्यांनी वैयक्तिक कारणे देत राजीनाम्याचे अर्ज सादर केले असून, त्यांचे राजीमाने मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील अनेक जण कामाचा ताण असल्याने नोकरी सोडत असल्याचे सांगण्यात येत आहे. पालिकेत गेल्या काही वर्षांत अनेक कर्मचारी निवृत झाले असून, अनेकांची बढती झाली.
त्यामुळे महापालिकेने करोना काळानंतर अभियंत्याच्या १२७ पदांची भरती घेतली होती. मात्र, यातील बहुतांश जणांनी स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या. त्या निकालाची वाट न पाहताच अनेकांनी महापालिका अभियंता पदाची परीक्षा दिली. आता मोठे पद मिळत असल्याने पालिकेच्या नोकरीला रामराम केला जात आहे.
एमपीएससी परिक्षांचे निकाल जानेवारी- फेब्रुवारीत लागले. त्यामुळे त्यांनी राजीनामे दिले आहेत. या अभियंत्यांचा एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. तर, महापालिकेने या नियुक्त्या करताना तयार केलेल्या प्रतीक्षा यादीची मुदतही १ वर्षच होती. ती जानेवारीमध्येच संपली. त्यामुळे आता हे १२ अभियंते पालिका सेवेतून मुक्त होत असले, तरी प्रतीक्षा यादीची मुदतही संपल्याने त्यातील उमेदवारांची संधीही हुकली आहे.
आतापर्यंत १२ अभियंत्यांचे राजीनामे आले असून, त्यातील १० मंजूर केले आहेत. राजीनामा दिल्यानंतर एका महिन्याची मुदत असते. मात्र, या उमेदवारांनी एक महिन्याच्या वेतन भरण्याची तयारी दर्शवल्याने तत्काळ त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. – प्रतिभा पाटील, प्रभारी उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग