जयपूर – पाच वर्षांपूर्वी, गोशाळेकडे दुभत्या गायी घेऊन जात असलेल्या दोन युवकांना गो-तस्कर समजून जमावाने केलेल्या मारपीट प्रकरणात, एका युवकाचा मृत्यु झाल्याच्या प्रकरणात अलवर न्यायालयाने जमावातील चौघांना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा ठोठावली असून एकाला पुराव्याअभावी निर्दोष सोडले आहे. परमजीत, धर्मेंद्र, नरेश आणि विजय अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषींची नावे आहेत. आरोपी नवल किशोरची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने चौघांना आयपीसी कलम 341, 304 अंतर्गत दोषी ठरवले.
हे प्रकरण राजस्थानात रकबर खान मॉब लिंचिंग प्रकरण म्हणून ओळखले जाते. 20 जुलै 2018 रोजी अलवरमध्ये रकबर खान आणि त्याचा मित्र अस्लम हे दोघे मध्यरात्रीच्या सुमारास दुभत्या गायींना गोशाळेकडे घेऊन जात होते. मात्र, रामगडच्या लालवंडी भागात काही गावकऱ्यांनी गायी तस्करीच्या संशयावरून दोघांना थांबवले.
दोन मुस्लिम युवक या गायींना कत्तलखान्याकडे घेऊन जात असल्याच्या संशयावरुन जमावाने या दोघांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर अचानक काही लोकांनी रकबरवर जीवघेणा हल्ला केला आणि त्याला जबरी मारहाण केली. हा सर्व प्रकार पाहून अस्लमने तेथून पळ काढला. अस्लमने थेट पोलिस स्टेशन गाठले आणि घटनास्थळी तो पोलिसांना घेऊन आला.
पोलिस येताच जमावाने रकबरला पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, काही तासांनंतर रकबरचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. रकबरच्या मृत्यूनंतर बराच गदारोळ झाला. त्याचवेळी पोलिसांनी आरोपी धर्मेंद्र यादव, परमजीत सिंग, नरेश, विजय आणि नवल किशोर यांना अटक केली. आरोपी विजयला घटनेच्या 13 महिन्यांनंतर जयपूर येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरातून अटक करण्यात आली होती. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुनील गोयल यांनी हा निकाल दिला आहे.