नवी दिल्ली – बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयकावर (यूएपीए) शुक्रवारी राज्यसभेत मोहोर उमटविण्यात आली आहे. या विधेयकाच्या बाजूने 147, तर विरोधात 42 मते पडली. यापूर्वी लोकसभेत 24 जुलै रोजी हे विधेयक मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक मंजुरीसाठी आज राज्यसभेत सादर करण्यात आले.
युएपीए विधेयकावर शुक्रवारी राज्यसभेत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. या विधेयाकवरील चर्चेदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. कॉंग्रेसने दहशतवादाला धर्माशी जोडले, असा आरोप त्यांनी यावेळी केला. या विधेयकातील तरतुदींनुसार एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करणे शक्य होणार आहे. अमित शहा यांनी यावेळी दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवाद मानवतेच्या विरोधात असतो, असे सांगितले. तसेच युएपीए विधेयकाची भीती कशासाठी वाटते, असा सवाल विरोधकांना विचारला.
यावेळी कॉंग्रेस खासदार पी. चिंदंबरम यांनी विधेयकाला विरोध दर्शवला. या विधेयकात एनआयएला बळ देण्यासाठी असा उल्लेख आहे. तर दुसरीकडे केंद्राला बळ देत एखाद्या व्यक्तीचं नाव दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याचा किंवा काढण्याचा हक्क देण्यात आला आहे. विधेयकात करण्यात आलेल्या या खोडसाळपणाला आमचा विरोध आहे. आम्ही बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध घालणाऱ्या कायद्याला विरोध करत नाही आहेत, असे ते म्हणाले.
तसेच कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीदेखील विधेयकाला विरोध करत आम्हाला भाजपाच्या हेतूवर संशय असल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेसने कधीच दहशतवादावर तडजोड केली नाही. म्हणूनच आम्ही हा कायदा आणला. तुम्हीच नेहमी दहशतवादावर तडतोड केली. एकदा रुबैया सईद यांच्या सुटकेदरम्यान आणि दुसऱ्यांदा मसूद अजहरची सुटका करुन, असा आरोप त्यांनी केला.
याला उत्तर देताना अमित शहा म्हणाले, संघटनेवर बंदी असताना पुन्हा एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित का करावं अशी विचारणा चिदंबरम करत आहेत. कारण आपण एका संघटनेवर बंदी आणली आहे. पण तीच व्यक्ती दुसरी संघटनाही सुरु करु शकते. मग आपण कधीपर्यंत संघटनांवर बंदी आणत राहायचं ?. आणीबाणीच्या काळात काय झाले होते? सर्व प्रसारमाध्यमांवर बंदी आणली होती. सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबले होते. गेल्या 19 महिन्यात कोणतीही आणीबाणी लागू करण्यात आली नाही आणि तुम्ही आमच्यावर कायद्याचा गैरवापर केला असा आरोप करत आहात. कृपया आपला भूतकाळ तपासून पहा, अशी टीका अमित शहा यांनी कॉंग्रेसवर केली.