पुणे – कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशभरामध्ये २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला असून येत्या १४ एप्रिलला त्याची मुदत संपुष्टात येत आहे. लॉक डाऊनमुळे अख्खा देश ठप्प झाला असून याची झळ बळीराजाला देखील सोसावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अडचणीत सापडलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या सुटकेसाठी सरकारकडे विनंती केली आहे. शेट्टी यांनी, देशातील लॉक डाऊनचा कालावधी संपताच सरकारने तातडीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना द्राक्षं, आंबे, पपई, भाजीपाला आणि दूध हे बाजारपेठांपर्यंत पोहचवण्याची मुभा द्यावी अशी मागणी केलीये. सध्या कोरोना विषाणूला अटकाव करण्यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने शेतकरी-ग्राहक साखळी विस्कळीत झाली असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. असं देखील ते म्हणाले.
खेड्यांमध्ये कोरोनाचा फार प्रसार झाला नसल्याने आम्ही ग्रामीण भागात १४ एप्रिलनंतर सरकारने टाळेबंदी उठवावी अशी मागणी करतोय. गावाकडची माणसं जी मुंबई आणि पुण्यात वास्तव्य करत होती ती ज्यावेळी आपल्या गावी परतली तेव्हा त्यांना सक्तीचे विलगीकरण करण्यात आले होते. सरकार परदेशातून आलेल्यांनाही क्वारंटाइनमध्ये ठेवतं आहे. अशात ग्रामीण भागातील लोकांनीही बाहेरुन आलेल्या लोकांना ही प्रक्रिया पार पाडायला लावली. आता बाहेरुन माणसं आलीच नाहीत तर रोगाचा फैलाव कसा काय होईल? असा प्रश्न शेट्टी यांनी एका वृत्तसंकेतस्थळाशी बोलताना उपस्थित केला.