नवी दिल्ली -लॉकडाऊनविषयी प्रतिकूल टिप्पणी करणारे उद्योगपती राजीव बजाज यांच्यावर भाजपने जोरदार पलटवार केला. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. पण, बजाज हे काही करोनाविषयक तज्ञ नाहीत, असे भाजपने म्हटले.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांची भूमिका पुढे करण्यासाठी बजाज यांचा वापर केला. त्यांच्यातील संभाषणात राहुलच अधिक बोलले, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते गोपाळकृष्ण आगरवाल यांनी दिली. करोना फैलावामुळे मोठी जीवितहानी टाळण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला. जनतेच्या जीविताच्या रक्षणाला सरकारने प्राधान्य दिले. करोना संकटाच्या तीव्रतेमुळे लॉकडाऊन नसता तरीही अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झालाच असता. देशातील कमकुवत आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याची संधी लॉकडाऊनमुळे मिळाली, असे ते म्हणाले.