पुणे – पुणे रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या काही रेल्वेंचे आरक्षण पुढील दोन महिन्यांसाठी हाऊसफुल झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये पुण्याहून बाहेर गावी जाण्याचा बेत आखणाऱ्यांनाम रेल्वेचे आरक्षण मिळणे कठीण आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर पुण्याहून देशभरातील विविध ठिकाणी जाणाऱ्या रेल्वेंचे आरक्षण हाऊसफुल झाल्याने अनेकांच्या फिरायला जाण्याच्या विचारावर विरजण पडू शकते.
पुणे रेल्वे स्थानकातून दिवसाला 155 रेल्वेंची ये-जा असते. पुण्यावरून मुंबई, सोलापूर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, गोवा, जम्मू, गोरखपूर, लखनऊ, दिल्ली, पटना, अजमेर, कन्याकुमारी यासह अन्य राज्यात देखील रेल्वेने जाता येते.
राज्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि चाकरमानी पुण्यात स्थायिक झाले आहेत. उन्हाळी सुट्टीत नागरिक मूळ गावी किंवा फिरायला जाण्यासाठी नियोजन करतात. रेल्वेने जलद प्रवास आणि तिकीट स्वस्त असल्यामुळे नागरिक रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात.
रेल्वेचे तिकीट 90 दिवस आधीपासून आरक्षणासाठी खुले होते, त्यामुळे अनेकांनी आधीपासूनच तिकीट बुक करून ठेवल्याने, आता जे प्रवासी बाहेरगावी अथवा आपल्या मूळ गावी रेल्वेने जाण्याचा विचार करत आहेत त्यांना इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे.
सर्वाधिक गर्दी गोवा मार्गावर
15 मार्च ते 15 मे या दोन महिन्यांच्या कालावधीत अनेक रेल्वेंचे आरक्षण फुल झाले असले तरी सर्वाधिक गर्दी गोवा मार्गावर असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. पुण्यापासून 500 किमी अंतरावर असलेले गोवा सर्वांनाच आकर्षित करणारे असल्याने गोव्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून पुणे-गोवा एक्सप्रेस आणि गोवा एक्स्प्रेस अशा दोन रेल्वे धावतात, मात्र दोन्ही रेल्वेंचे तिकीट मिळणे अवघड झाले आहे.