नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी केलेल्या मोदी आडनावाबाबतच्या वक्तव्याबाबत त्यांच्या विरोधात मानहानीच्या खटल्याचा निकाल 23 मार्च रोजी येण्याची शक्यता आहे. गुजरातमधील सुरत शहरातील न्यायालय काँग्रेस खासदारा राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदेश देऊ शकते. त्यांचे वकील किरीट पानवाला यांनी याबाबत सांगितले की, जेव्हा आदेश निघेल तेव्हा काँग्रेस नेते स्वतः कोर्टात हजर राहतील.
राहुल गांधी एका सभेत म्हणाले होते, “सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे आहे?” त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने दावा केला आहे की राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे एका रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्यामुळे संपूर्ण मोदी समुदायाची बदनामी होते आहे.
राहुलच्या वकिलांनी सांगितले की, मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या शुक्रवारी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकला आणि निकालासाठी २३ मार्चची तारीख निश्चित केली. किरीट पानवाला म्हणाले की, न्यायालयाने फौजदारी मानहानीच्या खटल्याची सुनावणी पूर्ण केली आहे आणि 23 मार्च रोजी निकालासाठी हे प्रकरण ठेवले आहे. आदेश देताना राहुल गांधी न्यायालयात हजर राहणार आहेत.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी तीन वेळा कोर्टात हजर होते. ऑक्टोबर 2021 मध्ये ते शेवटचा आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले आणि त्यांनी स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगितले.फेब्रुवारी 2023 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या वैयक्तिक उपस्थितीची मागणी करणाऱ्या तक्रारदाराच्या याचिकेवर मार्च 2022 मध्ये लावलेली अंतरिम स्थगिती उठवल्यानंतर मानहानीच्या खटल्यातील अंतिम युक्तिवाद पुन्हा सुरू झाला.