मुंबई – एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले आहे दुसरीकडे सरकारच्या मदतीच्या बळीराजाला अजूनही आशा आहे. त्यासोबतच राज्यात विविध क्षेत्रातील मागण्यांसाठी मोर्चे निघत आहेत. सत्तासंघर्षा बाबतची सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केव्हाही येऊ शकतो.एकूणच राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अशात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली आहे. जी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यानंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्याला मोठा फटका बसला. शासकीय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्याला मदत मिळू शकलेली नाही. विदर्भ,मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. अशात शेतकऱ्याला सरकारकडून अजूनही मोठ्या मदतीची आशा आहे. परंतु ही मदत लवकर मिळणार का ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असताना राजू शेट्टी यांनी कवितेतून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
राजू शेट्टी यांनी ट्विटरद्वारे आपली कविता पोस्ट केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात,”कांदा आंदोलन झालं, कवडीमोल भावाने विकला..पण तुमच्या भाज्या बेचव होऊ दिल्या का ?
ऊस आंदोलन झालं, कारखाने बंद केले…पण चहातला गोडवा कमी होऊ दिला का ?
दूध आंदोलन झालं, वासरांना दुधाने अंघोळ घातली…पण तुमची लेकरं ऊपाशी झोपु दिली का ?
ब-याचवेळा सरकारी कार्यालयांना घेराव घातला…पण महिला कर्मचा-यांची गैरसोय होऊ दिली का ?
सरकारशी संघर्ष झाला, रास्ता रोको केला…जीवन-मरणाच्या दारात ऊभ्या असणा-या रुग्णांची अडवणुक केली का ?
आम्ही संप पुकारले, बंदची हाक दिली…कधी विद्यार्थ्यांना त्रास दिला का ? अत्यावश्यक सेवा थांबवल्या का ?
सरकारी संपक-यांनो, आज गारपीट झाली, अवकाळी झाला…आता माणुसकी पुढं तुम्हाला संप मोठा झाला का ?
आमच्या फळबागा गेल्या, धान्य – भाजीपाला सगळं वाहून गेलं…पंचनाम्याअभावी आमच्या संसारावर आता वरवंटा फिरु दे का ?”
— Raju Shetti (@rajushetti) March 20, 2023
शासकीय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान यावेळी राजू शेट्टी यांनी सर्वांसमोर मांडले आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणि त्यांनी केलेल्या आंदोलनांबाबत देखील शेट्टी यांनी यावेळी मार्मिक पद्धतीने भाष्य केले आहे. तसेच शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे होणे गरजेचे असल्याचे शेट्टी यांनी म्हंटले आहे.