चंदिगढ – आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पंजाबच्या पटियाला शहरात शांतता मोर्चात भाग घेतला. यावेळी आपल्या भाषणात ते म्हणाले, ‘पंजाब विधानसभेच्या निवडणुका 2022 मध्ये होणार आहेत, निवडणुकीपूर्वी पंजाबच्या शत्रूंनी घाणेरडे कृत्य सुरू केले आहे. दरबार साहिबमध्ये अपवित्र कृत्य करण्याचा प्रयत्न करणारे आणि लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंडही अद्याप पकडला गेलेला नाही.
केजरीवाल पुढे म्हणाले, गेल्या निवडणुकीतही धमाका झाला होता, पण आजपर्यंत मास्टरमाईंड पकडला गेला नाही. पंजाब यांच्या हाती राहिला तर पंजाबचा नाश होईल. आता सगळ्यांना एकत्र यायचे आहे. 3 कोटी पंजाबी लोकांना संदेश द्यायचा आहे की आम्ही पंजाबचे वातावरण खराब होऊ देणार नाही. आता पंजाबची सत्ता पंजाबच्या जनतेच्या हातात द्यायची आहे. आजपर्यंत कोणतेही सरकार सध्याच्या पंजाब सरकारपेक्षा कमकुवत नव्हते. सगळे आपापसात भांडत आहेत. हे सरकार शांतता आणि सुरक्षा देण्यात अपयशी ठरले आहे, या सरकारला पुढील निवडणुकीत उलटवावे लागेल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.