पुणे – हवामान विभागाने यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यातच शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठाही कमी झाला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे 31 ऑगस्ट 2023 पर्यंत नियोजन करण्यासाठी उद्या (बुधवारी) कालवा समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, या बैठकीत शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवायचे की दिवसाआड पाणी कपात करायची याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच, उपलब्ध पाण्याचे नियोजन लक्षात घेऊन शेतीसाठी उन्हाळी आर्वतन देण्याचा निर्णयही घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी कपात केल्यास पाण्याचे नियोजन कसे असेल, तसेच दिवसाआड पाणी दिल्यास नियोजन कसे असेल या दोन्ही बाबतचे प्रस्ताव तयार केले असून, बैठकीत ते सादर केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, सद्यस्थितीत खडकवासला धरणसाखळीत 11.76 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
“एल निनो’चा धसका!
यंदा “एल निनो’मुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. परिणामी, शासनाने उपलब्ध पाणीसाठयाचे नियोजन करण्याचे आदेश दिले असून हे 31 ऑगस्ट पर्यंतचे असणार आहे. त्यानुसार, महापालिकेस सुमारे साडेसात टीएमसी पाण्याची गरज आहे. तर पाटबंधारे विभागास उन्हाळी आर्वतनासाठी साडेचार ते पाच टीएमसी पाण्याची गरज आहे. याशिवाय, या कालावधीत 2 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन गृहीत धरले तरी एकूण 12 ते 13 टीएमसी पाण्याची गरज आहे. पण प्रत्यक्षात पाणी मागणीपेक्षा एक ते दोन टीएमसीने कमी आहे. तर, शेतीला पाणी न दिल्यास शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, महापालिकेनेच पाणी कपात करावी अशी शासन तसेच जलसंपदा विभागाची भूमिका आहे. त्यामुळे मे अखेर पर्यंत आठवडयातून एक दिवस पाणी कपात तर मे नंतर दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले जाण्याची शक्यता आहे.
पालिकेची कोंडी?
दरम्यान, महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याची तयारी केली असून, लगेच येत्या गुरूवारी ( दि.27 ) रोजी पालिकेने एका दिवसांचा पाणी बंदही जाहीर केला आहे. मात्र, मे अखेरपर्यंत पालिकेने एक दिवस पाणी बंद ठेवले तरी केवळ अर्धाच टीएमसी पाणी वाचणार आहे. त्यामुळे, महापालिकेने दैनंदिन दिल्या जाणाऱ्या पाण्याची वेळ कमी करावी अथवा दिवसाआड पाणी द्यावे असा दबाव आणला जात आहे. त्यामुळे प्रशासनानेही हा निर्णय कालवा समितीकडे टोलविला आहे. मात्र, सध्याची पाण्याची स्थिती लक्षात घेता पालिकेची चांगलीच कोंडी झाली आहे.