पुणे – यंदा एल निनोमुळे मॉन्सून लांबणीवर जाण्याची शक्यता असून, जून-जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडणार नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आत्तापासून उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील 26 धरणांपैकी 22 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील चार महिने पिण्यासाठी तसेच शेतीला पाणी मिळेल असे नियोजन पाटबंधारे विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांना करावे लागणार आहे.
मागील वर्षी जून 2022 अखेरपर्यंत पावसाने दडी मारली होती. त्यामुळे धरणातील पाण्याने तळ गाठला होता. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला धरण परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली. यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणांमध्ये पाण्याचा येवा वाढला. त्यामुळे पाणीपातळीत वाढ होत राहिली. त्यामुळे ऑगस्ट महिना अखेरपर्यंत सर्वच धरणे 100 टक्के भरली. तसेच परतीचा पाऊससुद्धा चांगला झाला होता. आता धरणांमधून शेतीला आवर्तन सुरू आहे. तसेच पिण्यासाठीसुद्धा धरणातून पाणी सोडले जात आहे. पुढील दोन महिन्यांत होणारे बाष्पीभवन या सर्व बाबींचा विचार करून प्रत्यक्षात किती पाणी मिळणार आहे, याचा विचार करून पाटबंधारे विभागाकडून नियोजन केले आहे.
खडकवासला साखळीत 12.99 टीएमसी साठा
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, आणि टेमघर या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. सद्यस्थितीत चारही धरणांमध्ये मिळून एकूण 12.99 टीएमसी म्हणजे 44.55 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर भामा आसखेड धरणात 3.65 टीएमसी म्हणजे 47.61 टक्के पाणीसाठा आहे.