पुणे – शाळा, महाविद्यालयांमधील स्वच्छतागृहांची अस्वच्छता यामुळे विद्यार्थ्यांमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन (युटीआय)ची समस्या निर्माण होत आहे. स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याने तेथे जावे लागू नये यासाठी लघवी रोखून धरणे, पाणी कमी पिणे, यामुळेही आरोग्याच्या अन्य समस्या निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये महापालिकेतील शाळांविषयीची तक्रार सर्वाधिक आहे.
काही शाळा आणि महाविद्यालयांची स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात. लहान मुलांना या इन्फेक्शनची जाणीव नसते. ते लघवी रोखू शकत नसल्याने तेथे जातात. ई-काेलाय यांसारखे हानिकारक विषाणू तेथे वाढतात. तेव्हा तेथूनच त्यांना मूत्रमार्गासंबंधी संक्रमणाची शक्यता अधिक वाढते. त्याचे परिणाम इतर अवयवांवरही हाेतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि शैक्षणिक कामगिरीवरही परिणाम होतो.
वारंवार लघवी होणे, वेदना किंवा जळजळ होणे. अंथरुण ओले करणे ही त्याची लक्षणे आहेत. अस्वच्छतागृहातून जीवाणू, ई कोलाई मूत्रमार्गात प्रवेश करतात आणि तेव्हा मूत्रपिंड, मूत्राशय किंवा मूत्रवाहिनीला संक्रमित करतात. त्याचा परिणाम हा किडणी, मूत्राशय यावरही हाेताे. हे स्वच्छ हे हानिकारक जिवाणूंच्या वाढीचे केंद्र ठरू शकते.
मुलींमध्ये लघवी रोखून धरण्याचे मुख्य कारण आहे ती म्हणजे अस्वच्छ स्वच्छतागृहे. जर एखाद्या व्यक्तीने चार तासांपर्यंत मूत्र रोखून धरले तर, त्यांच्या शरीरात अशा प्रकारच्या बॅक्टेरियाची संख्या दुप्पट होते, परिणामी संसर्गाचा प्रसार आणि यूटीआय होण्याची शक्यता वाढते. शरीररचनेमुळे मुलींमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येते.
मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक
बऱ्याचदा मूत्रविसर्जन रोखावे लागू नये, यासाठी शालेय विद्यार्थी त्यांचे पाण्याचे सेवन कमी करतात किंवा लघवी रोखून धरतात. या दोन्ही बाबी जिवाणूंच्या वाढीस चालना देतात. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती विकसित होत असते. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता अधिक असते. साेबत शौचालय वापरल्यानंतर हात व्यवस्थित न धुणे किंवा नीट न पुसणे, यामुळे मूत्रमार्गात संसर्ग हाेऊ शकताे, असे मत बालरोग तज्ज्ञ डॉ. अतुल पालवे यांनी व्यक्त केले.