पुणे – तीर्थंकर भगवान श्री महावीर स्वामीजी यांच्या 2622 वा जन्म कल्याणक महोत्सव निमित्ताने मंगळवारी श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जैन बांधव उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी “त्रिशलानंदन वीर की…जय बोलो महावीर की…’ असा जयघोष करण्यात आला.
सकाळी साडेसात वाजता जन्मकल्याण सोहळा आणि पंचामृत अभिषेक पूजेने सुरुवात झाली. श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर येथून पालखी आणि रथपूजन होऊन मिरणुकीला प्रारंभ झाला. रथोत्सवात सुमारे 20 विविध रथांचा समावेश होता. शहरातील विविध जैन मंदिरांचे चित्ररथ हे यंदाच्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. भगवान श्री महावीरांचा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष वेशभूषा, सजीव देखावे, आकर्षक वाद्य, लेझीम पथक, भव्य पंचरंगी ध्वज घेऊन जैन श्रावक-श्राविका मिरवणुकीत सहभागी झाले. सोन्या मारुती चौकात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार माधुरी मिसाळ, मोहन जोशी, विशाल धनवडे, अभय छाजेड, कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, हेमंत रासने, प्रवीण चोरबेले आदींनी भगवान महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीत सहभाग घेतला.
भगवान महावीरांचा पाळणा, नामकरण सोहळा, भारतातील विविध प्रांतांतील विविध संस्कृतींमध्ये जैन श्रावक भगवान महावीरांची भक्ती करणारा सजीव देखावा चित्ररथावर होते. पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने श्राविकांनी सादर केलेले लेझीम पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. सातारा रस्त्यावरील आदिनाथ स्थानक येथे या मिरवणुकीची समाप्ती झाली.
समितीचे अध्यक्ष अचल जैन, उपाध्यक्ष विजयकांत कोठारी, महावीर कटारिया, भरत शहा, सचिव अनिल गेलडा, संपत जैन, गणपत मेहता, समीर जैन, सतीश शाह, समीर जैन, विजय भंडारी, मिलिंद फडे, हिराचंद राठोड, मांगीलाल मांडोत, हरेश शहा, नितीन जैन, अमोल झवेरी, जिनेंद्र कावेडिया, भरत सुराणा आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. याशिवाय सायंकाळी चार वाजता दुचाकीवर “अहिंसा रॅली’ काढण्यात आली. ही रॅली श्री दादावाडी जैन मंदिर येथून सुरू झाली आणि गंगाधाम चौकात नाजुश्री येथे त्याची समाप्ती करण्यात आली.
महर्षिनगर येथे “शोभा यात्रा’तून महावीरांचा जयघोष
महर्षिनगर येथे प्रतिभा नवकार जैन संघातर्फे भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. नामदेव शाळा ते आदिनाथ स्थानकपर्यंत महावीर स्वामी यांचा शांतीचा संदेश देत शोभा यात्रा निघाली होती. यावेळी जैन धर्मगुरूंच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी अभय छाजेड, राजेंद्र शिळीमकर, अरुण शिंगवी, बाळासाहेब अटल, प्रवीण चोरबेले, राजश्री शिळीमकर, निखिल शिळीमकर, पुष्कर आबनावे, निखिल शिळीमकर, अनिल भन्साळी, श्वेता होनराव, निलेश नवलाखा, प्रतिभा नवकार जैन संघाचे अध्यक्ष दिलीप कर्नावट, ऍड. सतीश धोका, दिलीप खाटेर, कांतीलाल पारख, चंद्रकांत दर्डा, राजेंद्र संचेती, दिलीप सरणोत, प्रतिभा नवकार महिला मंडलच्या पदाधिकारी, प्रतिभा नवकार युवक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कै. भारती राजेंद्र संचेती यांच्या स्मरणार्थ प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन ऍड. सतीश धोका यांनी केले.
सन 1952 पासून परंपरा
“श्री जैन सामुदायिक उत्सव समिती’ पुणे सन 1952 पासून जैन समाजाचे चारीही संप्रदाय श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री दिगंबर जैन समाज एकत्र येऊन श्री तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजींचा जन्म कल्याणक महोत्सव (महावीर जयंती) दरवर्षी साजरा करतात.