येरवडा- नाल्याचा प्रश्न मार्गी लावा तरच मत मागायला या…, असा इशाराच सर्वपक्षीय उमेदवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना येरवडा येथील गृह निर्माण सोसायटीतील रहिवाशांनी दिला आहे. नैसर्गिक नाले अरुंद केल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरत असून याकडे नगरसेवक आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराच देण्यात आला आहे.
शांतीरक्षक सोसायटी, हर्मेस हेरिटेज 1,2,3 तसेच त्रिदलनगर या सोसायटीच्या बाजुने नैसगिक नाला वाहत असून काही बांधकाम व्यावसायिक तसेच रस्त्याच्या कामासाठी पालिकेकडून बांधकाम करण्यात आले आहे. नगर रस्त्यावर तर 15 ते 20 फुट रुंदीचा नाला पाच फुट केला आहे, त्यातही ड्रेनेजचे चेंबर्स या
नाल्यात टाकल्याने पाणी अडून राहते. हा नाला रुंद करावा, नाल्यातील चेंबर्सचे अतिक्रमण काढावे या मागणीचे निवेदन संबंधीत रहिवाशांनी खासदार, आमदार ते नगरसेवकांना देऊनही याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे पुढच्या प्रत्येक निवडणुकीवर येथील सर्व सोसायटीधारक बहिष्कार टाकतील, असा इशारा पुणे महापालिका आयुक्तांना देण्यात आला आहे.
नाले अरूंद झाल्याने पावसाळ्यात सोसायटीत पाणी शिरते. दरवर्षी, अनेकांच्या घरातही गुडघाभर पाणी साचते. महापालिकेने नाल्याचा “कॅचमेंट एरिया’ लहान केल्याने मुसळधार पावसात पाणी वाहुन जाण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी अडुन ते पुन्हा मागे फिरते. गेल्या पावसाळ्यात अनेकांच्या घरात सात ते आठ फुट पाणी साचून राहिले होते. रातील अनेक वस्तू, अन्नधान्य याचे नुकसान झाले. यावर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्याच्या रुंदीकरण करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
“नाल्याचा दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. पावसाचे पाणी घरात शिरत असून अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करावा लागत आहे. नाला अरुंद केल्याने पावसाळ्यात नाला ओव्हर फ्लो होऊन घाणपाणी घरात शिरते. यामुळे घरातील वस्तुंचे जिवनावश्यक वस्तुंचे नुकसान होते.”
– अनुराधा धुमाळ, स्थानिक रहिवासी
“दोनवर्षांपासून पावसाचे पाणी घरात शिरण्याचे प्रमाण वाढले आहे. पालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी येतात फोटो काढतात आणि जातात, काम मात्र काहीही करीत नाहीत. आमच्यासाठी हा कायमचा त्रास असून पालिकेने लवकर मार्ग काढावा.”
– निर्मला तोडइट्टी, स्थानिक रहिवासी
“नाला ओपन होता तो बंद करण्यात आला. मात्र, बंद करताना लहान आकाराचे पाइप टाकण्यात आल्याने पावसाळ्यात नाल्यातून पाणी मागे फिरते. या पाण्यातुन घरात बेडूक, विंचू असे किटक येतात. अशा वेळी संपुर्ण परिसराची लाइटही घालविली जाते.”
– स्वाती कपिले, स्थानिक रहिवासी
“पावसाळ्यात पाणी घरात शिरते, प्रत्येकाचे पावसाळ्यात एका कुटुंबाचे जवळपास 50 हजाराचे नुकसान होते. येथील भिंत पाडल्याशिवाय पाण्याचा निचरा होत नाही. पालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.”
– अनंत कदम, स्थानिक रहिवासी