‘एल्गार’प्रकरणी चौकशीची मागणी
पुणे – एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलिसांनी केलेली कारवाई संशयास्पद आहे. पोलिसांनी सूडभावनेने अनेकांना तुरुंगात डांबून ठेवले होते. या प्रकरणात राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमणूक करुन पोलिसांची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली. भाजपने सत्तेचा गैरवापर करत पोलिसांना हाताशी धरुन अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचे खटले भरल्याचाही दावा पवारांनी केला.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी भाजप सरकारच्या काळात उद्भवलेल्या विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले.
एल्गार परिषदेतून सामाजिक सौहार्द बिघडवल्याचा ठपका ठेवून पुणे पोलिसांनी अनेक लेखक, विचारवंत व सामाजिक
कार्यकर्त्यांवर कारवाई केली. अनेकांना अटकही करण्यात आली. त्यापैकी आजही काहीजण न्यायालयीन लढाई लढत आहेत. पोलिसांनी अनेकांना नक्षलवाद्यांची पुस्तके घरात असल्याने अटक केल्याची प्रकरणे आहेत. तशी पुस्तके माझ्याही घरात आहेत. केवळ त्या आधारावर कुणालाही अटक करणे चुकीचे आहे. या प्रकरणावरून पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा आरोप पवार यांनी केला.
संयुक्त महाराष्ट्र लढ्याची आठवण
न्यायासाठी लढणाऱ्या लोकांनी एल्गार परिषदेत दडपशाहीविरोधात आवाज उठवला. या परिषदेत नामदेव ढसाळांच्या कविता वाचल्या होत्या. विद्रोही विचारांच्या कविता वाचणे अथवा घरात नक्षलवादी साहित्य वाचणे हा काही अटकेचा आधार होऊ शकत नाही. वाचन करणाऱ्यांकडे अशी पुस्तके असतात. त्यामुळे याचा अर्थ ते नक्षलवादी अथवा गुन्हेगार आहेत, असा होत नाही. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही तसे झाले होते. मात्र त्यासाठी कोणी राष्ट्रद्रोहाचे खटले भरले नव्हते, याची आठवणही पवारांनी करुन दिली.