पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) “सक्षम’ आणि “नियोजित’ बससेवा उपलब्ध होईल, अशी आशा असते.
मात्र, 2007 मध्ये स्वतंत्रपणे स्थापना झालेल्या “पीएमपीएमएल’ला 14 वर्षांनंतरही कार्यकाळ पूर्ण करणारे “सारथी’ मिळाले नाहीत. 14 वर्षांत तब्बल 17 अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालकपदी वर्णी लागली. नुकतीच व्यवस्थापकीय संचालकपदी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे.
पुणे नगरपालिकेने 1940 च्यादरम्यान सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुरू केली. पहिल्या टप्प्यात “आरटीओ’ने सुमारे चार मार्गांवर 20 बसेसना परवाना दिली. पुणे नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाल्यानंतर ही सेवा टप्प्याटप्प्याने विकसित होऊ लागली. या पाठोपाठ पिंपरी-चिंचवड महानगर परिवहन उपक्रमाची स्थापना झाली.
तर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये “सक्षम’ आणि चांगली वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने “पुणे महानगरपालिका परिवहन’ (पीएमटी) आणि “पिंपरी-चिंचवड महानगर परिवहन’ (पीसीएमटी) या दोन्ही उपक्रमांचे एकत्रीकरण केले असून, “पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला 19 ऑक्टोबर 2007 रोजी मान्यता मिळाली. मात्र, 14 वर्षांच्या सेवाकाळात 17 अधिकाऱ्यांची “अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक’ पदी नियुक्ती करण्यात आली.
महामंडळाचे 15 भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत, तर 1 भारतीय संरक्षण संपदा सेवेतील होते. तर, नवनियुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. यामध्ये सुबाराव पाटील, अश्विनीकुमार, नितीन खाडे, महेश झगडे, शिरीष कारले, दिलीप बंड, आर. एन. जोशी, श्रीकर परदेशी, ओमप्रकाश बकोरिया, कुणाल कुमाल, अभिषेक कृष्णा, तुकाराम मुंढे, नयना गुंडे, डॉ. राजेंद्र जगताप यांचा समावेश आहे.
या अधिकाऱ्यांपैकी केवळ जोशी यांनी 3 जानेवारी 2011 ते 31 ऑक्टोबर 2014 हा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. उर्वरित सर्व अधिकाऱ्यांनी केवळ एक ते दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
तर, जगताप यांची व्यवस्थापकीय संचालकपदी प्रतिनियुक्तीवर नेमणूक झाली होती. दरम्यान, श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात पीएमपीची आर्थिक स्थिती मार्गावर आली. तर, शिस्तीच्या बडग्यामुळे तुकाराम मुंढे यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. त्यामुळे नव्याने रुजू होणारे अधिकारी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबत औत्सुक्य आहे.