सर्व समाजामध्ये एकोपा टिकवून ठेवण्याचे आवाहन ः भुजबळांवरही टीका
पुणे – गरीब मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व समाजांमध्ये एकोपा रहावा, महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी देखील प्रयत्न करणार आहोत, असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
मराठा आरक्षण प्रश्नी शासन नेमके काय करत आहे, हे जाणून घेण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमेवत स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश कदम, विनोद साबळे, आप्पासाहेब कुढेकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, कुणबी व मराठा एक असल्याबाबतचे राज्यभरात अनेक ठिकाणी पुरावे आढळले आहेत. त्या आधारे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र का देत नाहीत? मराठा जातीचा समावेश 83 क्र. वर कुणबीची तत्सम व पोटजात म्हणून का समाविष्ट करत नाहीत? 1994 साली एक शासन निर्णय काढून महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचे 16 टक्के आरक्षण वाढवण्यात आले. परंतु तो शासन निर्णय काढत असताना राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी होत्या का?
मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी गायकवाड आयोगाने अनेक पुरावे देऊनही सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज मागास नाही, अशी भूमिका का घेतली? याचे कारणे आपण पाहिलीत का? ती कारणे कोणती? आदी प्रश्नांबाबत संभाजीराजे यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांशी चर्चा केली, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
“त्या’ मताबद्दल आता पश्चाताप
मंत्री छगन भुजबळ हे दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करत असून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आवर घातला पाहिजे. मागील काळात छगन भुजबळ हे फुले- शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे वारस असल्याचे मत मी व्यक्त केले होते. मात्र, छगन भुजबळ यांची जातीयवादी भूमिका पाहून त्या वक्तव्याबद्दल मला पश्चाताप होत असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.