पुणे – मुस्लिम समाजातील महिलांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सुमारे सहा दशके लढा देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री सय्यदभाई यांच्या निधनाने चळवळीतील एक पर्व हरपले, अशी भावना सर्व क्षेत्रांतून व्यक्त करण्यात येत आहे.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संघटनात्मक काम आणि चळवळीत सय्यदभाई अग्रेसर होते. त्यांचा समाजाशी प्रत्यक्ष संवाद होता. त्यांचा तळागाळात संबंध होता. तलाकच्या प्रश्नाबाबत त्यांनी माघार घेतली नाही. या प्रश्नाला त्यांनी चळवळीचे स्वरुप दिले. शाहबानो प्रकरणातही त्यांनी मोठे काम केले. त्यावेळी समाजाचा विरोध झाला. आजच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कामाचे श्रेय सय्यदभाईंना द्यावे लागेल.- डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते
मुस्लिम समाजातील महिला आणि स्त्री सक्षमीकरणासाठी संपूर्ण आयुष्य सय्यदभाईंनी व्यतित केले होते. गेली 35 ते 40 वर्षे सातत्याने महिलांचे प्रश्न आणि त्यावरील उपाययोजना यावर त्यांनी चिंतन केले. त्यांचा सत्कारदेखील स्त्री आधार केंद्राने केला होता. त्यांचे कार्य अजरामर आहे. समाजातील सर्व घटकांतील महिलांसाठी त्यांच्या मनात असणारी ममत्वाची भावना पुढे नेणे आणि महिलांच्या अधिकाराबाबत काम करणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. – डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद
सय्यदभाईंच्या निधनाने मुस्लिम सुधारणावादी चळवळीतील एक मोठा कालखंड संपला. तलाक पीडित महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर कार्य केले. विरोध होऊनही ते निडरपणे उभे राहिले. त्यामुळे आम्हांला प्रेरणा मिळाली. काम कसे राहावे, हे त्यांच्याकडून शिकलो. त्यांनी न्यायालयीन पद्धतीने प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. शाहबानो प्रकरणावेळी देशभर आवाज उठवला होता. मी एक वर्ष त्यांच्याकडे राहिले होते. त्या दरम्यान ते आणि त्यांनी पत्नी यांनी मला मुलीसारखे सांभाळले, हे मनाला खूप भावले. याबाबत मी कृतज्ञ आहे.
– प्रा. रझिया पटेल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्या
सय्यदभाईंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. तलाकबाबतच्या कार्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याकडून अनेकांनी प्रेरणा घेतली असून, त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
– डॉ. शमसुद्दीन तांबोळी, अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक मंडळ
सय्यदभाईंच्या निधनाने मुस्लिम सुधारणावादी चळवळीतील एक प्रमुख दुवा निखळला आहे. हमीद दलवाईंसोबत त्यांनी मुस्लिम समाजाच्या आणि महिलांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला. त्यांचे कार्य सदैव स्मरणीय आहे.
– प्रकाश जावडेकर, खासदार, भाजप