फुरसुंगी – फुरसुंगी व उरुळी देवाची मनपा हद्दीतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला फुरसुंगी ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन आणि कायद्याची लढाई लढण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्यात ठराव कृती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आला.
नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित आहे. समाविष्ट 34 गावांमध्ये टॅक्स व मुलभूत सुविधांबाबत एकच समस्या असताना केवळ दोनच गावे का वगळली? इतर 32 गावांत काहीच प्रश्न वा समस्या नाहीत का ? असे प्रश्न ग्रामस्थांनी भेकराईनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शंकरनाना हरपळे, माजी नगरसेवक गणेश ढोरे, माजी उपसरपंच संजय हरपळे, दिनकर हरपळे, दादा कामठे, अमोल हरपळे, राजाभाऊ होले, राहुल चोरघडे, संदीपकाका हरपळे, अमित हरपळे, सुहास खुटवड, विजय हरपळे, जे.के कामठे, सागर हरपळे, किरण पाटील हरपळे,किरण सरोदे, आप्पा कसबे, गणेश हरपळे, रमेश निवंगुणे, दीपक भोसले आदी पदाधिकारी व कृती समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
फुरसुंगी व उरुळी देवाची गावच्या ग्रामस्थांची मते विचारात न घेता, हा निर्णय लादला आहे. राज्य सरकारने यावर जनमत घेण्याची गरज होती. प्रत्यक्षात काही लोकांच्या स्वार्थापायी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. ग्रामस्थांचा असंतोष महापालिकेकडून होणाऱ्या आवाजवी कर आकारणी विरोधात होता. काहींनी ग्रामस्थांच्या भावनांचा उपयोग नगरपरिषद करण्यासाठी करून घेतला. फक्त दोन गावांना हा न्याय का? इतर समाविष्ट गावांनी या कर आकारणीला विरोध केला आहे. मग त्यांच्याबाबत काय निर्णय घेणार आहात हेही स्पष्टीकरण द्यायला हवे. नगरपरिषद झाल्यास गावचा विकास होण्याऐवजी भकास होण्याची शक्यता आहे. येथील रस्ते रुंदीकरण व पाणी प्रश्न अधिक जटिल होऊ शकतो. याचाही विचार व्हायला हवा होता. मात्र, अवसान घातकी निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.