इंदापूर – गेली 18-20 वर्षे नुसत्या घोषणा करायच्या व कामाच्या नावाने शून्य, हिंगणगाव सारख्या परिसरात निवडणुकी कालावधीत यायचे आणि जातीपातीचे विष पसरवायचे, एखाद्या पाहुणेरावळ्याला धरायचे आणि जनतेचा गैरसमज करायचा, जातीपातीचे विष पसरून मतदान मागणार्या माणसाला जनतेने ओळखावे, असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथे शुक्रवारी (दि. 12) आयोजित केलेल्या जाहीर सभेत,तसेच अकरा कोटी बारा लाख निधीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन आमदार भरणे यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, श्रीमंत ढोले, अभिजीत तांबिले, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांदलगाव तरडगाव येथील गावकर्यांनी आमदार दत्तात्रय भरणे व मान्यवरांची मिरवणूक गावातून गुलाल उधळण करत काढली.
आमदार भरणे म्हणाले की, या तालुक्याने 20 ते 25 वर्षे मतदान दिले; मात्र विरोधकांनी का विकास केला नाही का रस्ते केले नाहीत, असा सवाल जनतेने विचारला पाहिजे. मुस्लीम बांधवांसाठी दफन भूमी वॉलकंपाऊंड का त्या कालावधीत करता आले नाही? कोणतेही पद ताम्रपट घेऊन आलेले नसते. पद मिळाले की बॉडीगार्ड नको रे बाबा हे असले सोंग मात्र, मिळाल्या पदाचा उपयोग सामान्य जनतेच्या सेवेसाठी केला पाहिजे हीच माझी भूमिका असल्याने काम करतो आहे, असे त्यांनी नमूद केले.
खासदार कधीही होणार नाही
मी खासदार होणार म्हणून चर्चा आहे; मात्र मी खासदार वगैरे कधीही होणार नाही. या तालुक्यातील जनतेने मला आमदार केले आहे तेच मला बरे आहे. कशाला लोकसभा काय करायची मला लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत काहीही विचार मनात नाही, मला तालुक्यातील जनतेची सेवा करायची आहे. स्पष्टोक्ती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.