लोणी देवकर – सध्या इंदापूर तालुक्यामध्ये एकच चर्चा रंगू लागली आहे. तालुक्यामध्ये झालेल्या अफू शेतीवरील कारवाईमुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे; परंतु सधन भागातील शेतकरी देखील या अशा अवैध पिकांकडे का वळाला, याचे देखील कारण आपण जाणून घेतले पाहिजे.
सध्या कृषीप्रधान देशात भेडसावत असलेला कांदाप्रश्न असेल किंवा ज्वलंत उसाचा विषय असेल असे अनेक नाना विषय शेतकऱ्यांसमोर “आ’ वासून उभे राहिलेले आहेत. शेतमालाला योग्य हमीभाव, बिघडलेले अर्थकारण, आसमानी संकट यामुळे शेतकऱ्यांसमोर आपण नेमकं करायचे काय? असे प्रश्न उभे राहिले आहेत.
अगदी उसापासून बोलायचं झालं तर शेतकऱ्यांनी दिवस-रात्र एक करून जपलेला ऊस तो घालविण्यासाठी कारखानदारांच्या हाता पाया पडावे लागते किंवा इतर तो जाळावा लागतो. टोळी मालकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक करीत एकरी पाच हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जातात.
वर्षभर शेतामध्ये राब राब राबायचे आणि ज्यावेळेस आपले पीक बाजारात जाईल त्यावेळेस बाजारभावाची हमी. ढासळलेलं अर्थकारण यामुळेच की काय शेतकरी अशा अवैध पिकांकडे वळाला आहे असा प्रश्न सध्या भेडसावत आहे.