इंदापूर -नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याची माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी शेती महामंडळाच्या अनेक महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी लक्षवेधी करून आवाज उठवला. या लक्षवेधीची तात्काळ दखल घेत, संबंधित मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेती महामंडळाच्या कामगारांचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असा शब्द दिला. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या शेती महामंडळाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.
आमदार भरणे यांनी शेती महामंडळाच्या संदर्भात, इंदापूर तालुक्यातील तसेच राज्यात पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा व औरंगाबाद या सात जिल्हयांमध्ये महाराष्ट्र शेती महामंडळाच्या एकूण 14 मळ्यांवर हजारो कामगारांपैकी 80 टक्के कामगार अनुसूचित जाती/जमाती, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत.
हे कामगार कच्च्या घरामध्ये व झोपड्यांमध्ये राहत असून या घरांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यांच्या राहत्या घराची पडझड झाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले असून, हे कामगार आपला जीव धोक्यात घालून त्याच पडक्या घरात राहून संसाराचा गाडा चालवत आहेत. ही महत्त्वाची बाब सरकारच्या लक्षात आणून दिली.
शासनाच्या माध्यमातून त्यांना इंदिरा आवास घरकुल योजनेतून घरेही मंजूर झाली असून, त्यांच्याकडे घर बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध नसल्याने अनेकांना घरकुल मंजूर असूनही स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध नसल्याने, अनेकांना घरकुल मंजूर असूनही जागेअभावी शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित राहवे लागत आहे.
याबाबत शेती महामंडळाच्या राज्यातील कामगारांनी निवृत्त व रोजंदार कामगार कामावर असलेले व मयत कामगारांचे वारसदार यांना राहण्यासाठी शेती महामंडळाकडे शिल्लक असलेल्या जमिनीपैकी दोन गुंठे जागा देऊन पंतप्रधान घरकुल योजनेच्या माध्यमातून घर बांधून मिळावी, अशी मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार दत्तात्रय भरणे यांनी लावून धरली.
खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाटप करण्यात आले. त्यावेळी जमीन भोगवाट वर्ग क्रमांक दोनच्या होत्या. या दहा वर्षानंतर भोगवटा वर्ग क्रमांक दोनच्या जमिनीचे रूपांतर भोगवट वर्ग एक मध्ये होणे अपेक्षित होते; परंतु अद्यापही ते झालेले नाही. सरकारने याबाबत तातडीने वर्ग दोन जमिनीचे एकमध्ये रूपांतर करण्याचा आदेश करण्यात यावा, अशीही मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली.
नापिक जमिनी बदलून द्या
शेती महामंडळातील वाटप करण्यात आलेल्या जमिनी ह्या क्षारपड, नापिक आहेत. त्याही बदलून देण्यात याव्या, शेतीमहामंडळ कामगार कर्मचारी यांना त्यांचा शेती महामंडळाकडे थकीत असणारा 4था व 5व्या वेतन आयोगाचा फरक देण्यात यावा. 6वा वेतन आयोग लागू करावा. याचा राज्यात असणाऱ्या 14 मळ्यावरील कामगारांना याचा लाभ मिळेल. रामराजे निंबाळकर समितीच्या शिफारशीनुसार कामगारांना न्याय देण्यात यावा. अशी महत्त्वाची भूमिका आमदार भरणे यांनी कामगारांसंदर्भात घेत सरकारला जाग आणली आहे.
महसूल मंत्र्यांचे मार्ग काढण्याचे संकेत
आमदार दत्तात्रेय भरणे यांनी शेती विकास महामंडळाच्या संदर्भात ज्या मागण्या केल्या आहेत. या मागण्यांची दखल महसूल मंत्री यांनी घेतली असून, लवकरच एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढला जाईल असा शब्द महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात दिला.