राहू – टाकळी भीमा व परिसरातील अनेक गावांच्या शेतीसाठी वरदान असणाऱ्या शिवतक्रार म्हाळुंगी बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. या प्रमाणात पाणी गळती होत राहिल्यास फक्त पंधरा दिवसांतच कोरडा होण्याची शक्यता आहे. दरवर्षी हीच तक्रार गावकरी करत असतात. परंतु पाटबंधारे विभागावर त्याचा काहीही परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी संतापले आहेत.
रब्बीचा हंगाम सुरू आहे. सध्या पिके फुलोऱ्यात तर काही ठिकाणी कोठे सुगीचा हंगाम आहे,वीज बिलाचा प्रश्न मिटला तर आता ही नवीन समस्या निर्माण झाली आहे. टाकळी भीमाच्या आजी- माजी पदाधिकाऱ्यांनी तसेच ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित कर्मचऱ्याशी संपर्क करून परिस्थिती सांगितली. परंतु काही फरक पडला नाही.
त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या संदर्भात अनेक वेळा संबंधीत कार्यालयाशी संपर्क केला. परंतु करीत आहोत. टीम पाठवली आहे, अशी उत्तरे दिली जात आहेत. बंधाऱ्याचे साधारणपणे आठ दरवाजामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. मध्य भागातील बरग्यातून पाण्याचा प्रवाह मोठा आहे.
ढापे हे खराब होऊन तुटलेले आहेत. त्यामुळे वेगाने पाणी वाहून जात आहे. प्रत्येक हंगामात हीच समस्या होते. त्यामुळे हा प्रकार जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल नरसाळे मंहणाले की, आम्ही वारंवार पाठपुरावा करीत असतो. परंतु दरवर्षी हीच समस्या असते.
प्रत्येक वेळी आपण तक्रार केली तरच हे दखल घेणार का. वरिष्ठ पातळीवरून आदेश दिले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. वाद घालूनच काम होणार असेल तर याचा विचार नागरिकांना आंदोलनाच्या स्वरूपात करावा लागेल.
कार्यालयाकडून योग्य त्या सूचना दिल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना पाहणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुरुस्ती केली जाईल. मागणीची दखल घेऊन दुरुस्ती केली जाईल.
– टी. ए. आंधळे, उप अभियंता, भामा आसखेड पाटबंधारे विभाग.