पुणे -इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरलेला कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. शालेय शुल्क न भरल्याने विद्यार्थ्याना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण झाल्यास योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना राज्य मंडळाने विभागीय मंडळांना दिल्या आहेत.
आता परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांनी शालेय शुल्क न भरल्यामुळे अथवा अन्य कारणास्तव विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्यास अडवणूक केली जाणे अथवा प्रवेशपत्र न देणे अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्र वितरणामध्ये अडचणी येत असल्यास राज्य मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी, अशा सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी राज्यातील सर्व विभागीय मंडळाच्या सचिवांना दिल्या आहेत.
प्रवेशपत्र प्राप्त करून घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ट करून घेण्याच्या सूचना संबंधित केंद्रसंचालक व परीरक्षक यांना विभागीय मंडळ स्तरावरून देण्यात याव्यात. सर्व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून त्याचा अहवाल मंडळास स्वतंत्रपणे सादर करावा लागणार आहे.