– शेरखान शेख
शिक्रापूर – पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल हे काही काळ कारागृहात असल्याने राजकारण शांत होते. गेल्या तीन वर्षांत विजनवासात गेलेले बांदल हे कारागृहातून बाहेर आल्यानंतर राजकीय कारकिर्दीची इनिंग खेळण्यास सज्ज झाले आहेत. नुकतीच त्यांनी राजकीय भूमिका आणि रणनितीवर भाष्य करीत भविष्यात होऊ घातलेल्या यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याचे संकेत दिल्याने बांदल यांची रणनीती राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरणार आहे. तसेच भाजपापुढे आव्हान निर्माण करतील, अशी अटकळ बांधली जात आहे.
बांदल यांचा जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष, असा राजकीय कार्यकाल आहे. बांदल यांनी शिक्रापूरसारख्या गावातून प्रथम ग्रामपंचायत निवडणूक लढवून सत्तांतर करीत सरपंचपद खेचून घेतले. दोनवेळा बाजार समितीची निवडणूक लढवून एकदा बहुमत नसताना राष्ट्रवादीचे काही सदस्य फोडून ते बाजार समितीचे सभापती झाले. ही त्यांची राजकीय खासियत आहे. प्रस्थापित राष्ट्रवादीवर मात केली होती. त्यानंतर बांदल यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा परीघ रुंदावत गेला.
बांदल यांना जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने केंदूर-पाबळ गटातून अपक्ष उमेदवारी लढवत विजय खेचून आणला. दरम्यान, त्यावेळी विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे तत्कालीन आमदार हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याने भाजपकडे उमेदवार नव्हता. त्यावेळी शिरूरची जागा एकतर्फी राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ नये, यासाठी भाजपच्या नेत्यांनी बांदल यांना उमेदवारी दिली. त्यावेळी बाबूराव पाचर्णे हे अपक्ष लढल्याने बांदलांना थोड्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते.
राष्ट्रवादीने पुन्हा बांदल यांना शिक्रापूर- तळेगाव जिल्हा परिषद गटाची उमेदवारी दिल्याने त्यांनी विजय मिळवत आरोग्य व बांधकाम विभागाचे सभापतीपद खेचून आणले. पाच वर्षांनंतर या गटात पुन्हा महिला आरक्षण जाहीर झाल्याने त्यांनी पत्नीसाठी रांजणगाव सांडस-तळेगाव ढमढेरे झेडपी गटात उमेदवारी मागितली होती. मात्र, राष्ट्रवादीने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष जिल्हा परिषद उमेदवारी लढवली होती. त्यांनी गटामध्ये दोन पंचायत समिती उमेदवार उभे केले होते. ते उमेदवार पराभूत झाल्यास पत्नीचा राजीनामा देईल, अशी भीष्मप्रतिज्ञा घेत तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते. तीनही उमेदवार निवडून आणले.
दरम्यान, त्यांनी लोकसभेसाठी तयारी करीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करणारच, असे जाहीर आव्हान देत शिरूरच्या आखाड्यात रान पेटवले होते. मात्र, यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बांदल यांना राष्ट्रवादीमध्ये प्रदेश उपाध्यक्षपद दिले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकाची भूमिका बजावत डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयात मताधिक्यांची भर घातली होती.
त्यामुळे बांदल हे राजकीय आखाड्यातील मुरब्बी राजकारणी झाले आहेत. बांदल यांनी आढळराव पाटील यांचा प्रथम फोन आला. आपल्या तब्येतीबाबत विचारपूस केल्याचे सांगितले आहे. तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात उमेदवार उभा करण्याचे देखील जाहीर केले आहे. यामुळे बांदल यांची रणनीती राष्ट्रवादीला प्रथम डोकेदुखी ठरणार आहे.
तिरंगी लढती होणार?
बांदल यांना तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समितीच्या निवडणुकीचा अनुभव आणि विजय पाठीशी असल्याने राष्ट्रवादीच्या प्रभाव क्षेत्रात आव्हान निर्माण करण्याचे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यात तालुक्यात भाजपाची संघटनबांधणी आहे. भाजपाचे पदाधिकारी सक्रिय असतात. आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही तिरंगी झाल्यास यात राष्ट्रवादीला फटका बसू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. तसेच भाजपाला दोन पातळीवर फटका किंवा फायदा होऊ शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही.