पुणे – राज्य शासनाने सरळसेवा भरतीसाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा दोन वर्षे वाढविण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण घेतला आहे. मात्र “एमपीएससी’च्या काही परीक्षा एप्रिलमध्ये होत आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या उमेदवारांना नवी सवलत मिळायला हवी, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
करोना आणि विविध प्रशासकीय कारणांमुळे मधल्या काळात भरती प्रक्रिया होऊ नाही. अशा कालावधीत ज्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या शासन निर्णयात आणखी सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. वयोमर्यादा वाढविली मात्र त्यांना परीक्षेसाठी अर्ज करता करण्याची संधी उलटून गेली आहे, याकडे उमेदवारांनी लक्ष वेधले.
एमपीएससी स्टुडंट राईटसचे महेश बडे म्हणाले, “वय सवलतीचा निर्णय झाला. वय 38 चे 40 आणि 43 चे 45 केले आहे. मागील 2 वर्षांत ज्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली होती, त्यांना संधी मिळत नाही. तसेच गट “ब’ आणि गट “क’ ची 30 एप्रिल रोजी परीक्षा होणार आहे. तर त्यासाठी अर्ज भरण्याची लिंक खुली केली पाहिजे.’ देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने शासनाने 75 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती प्रक्रिया राबवित असताना करोना व प्रशासकीय कारणांमुळे सरळसेवा भरती प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे हजारो उमेदवारांची वयाची मर्यादा संपुष्टात आली, त्यांना राज्य शासनाच्या दोन वर्षे वयाची सवलतीचा लाभ मिळणार आहे. परंतु त्यासाठी अर्ज करण्याची संधी दिली पाहिजे, तरच वयोमर्यादा वाढविण्याचा खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे.