पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाने पीएमआरडीए हद्दीत बससेवा सुरू करण्याचा विडा उचलला. या सेवेला नागरिकांचा प्रतिसाद पण मिळाला. मात्र, आता पीएमपीने एसटीच्या बरोबरीने भाडेवाढीचा मार्ग अवलंबला आहे. तर, ग्रामीण भागातील मार्गांवर दैनंदिन आणि मासिक पासदेखील बंद केले आहेत. परिणामी प्रवाशांना किमान 5 ते 15 रुपयांपर्यंत भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पीएमपीच्या या निर्णयामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पीएमपीकडून उत्पन्न वाढण्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील वेल्हा, नीरा, सारोळा, जुन्नर, सासवड, मुळशी, लोणावळा आदी भागांतील सुमारे 50 हून अधिक मार्गांवर सेवा सुरू केली. या बससेवेला ग्रामीण भागातून शहरात येणारे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. अनेक भागांतील एसटीची सेवा बंद असल्याने प्रवासी मोठ्या संख्येने पीएमपीकडे वळाले होते. यासह यात्रा-जत्रांच्या निमित्तानेदेखील जादा बसेस सोडण्यात येत आहते. एसटी आणि खासगी वाहनांच्या तिकीट दराच्या तुलनेत पीएमपीचे तिकीट आणि 70 रुपयांचा दैनंदिन पास प्रवाशांना अधिक सोयीचा असल्याने नागरिक पीएमपीचा पर्याय निवडत होते. मात्र, आता पीएमपी आणि एसटीचे भाडेदर समान होवू लागले आहेत.
पीएमपीने उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने 70 रुपयांचा दैनंदिन पास आणि 1 हजार 400 रुपयांचा मासिक पास 1 एप्रिलपासून अचानकपणे बंद करण्याचा निर्णय घेतला.
निर्णय झाला पण यंत्रणा जुनीच
प्रशासनाने भाडेवाढीचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर ई-तिकीट मशिन्स “अपडेट’ होणे आवश्यक होते. मात्र, अनेक मार्गांवरील वाहकांच्या ई-तिकीट मशिन्स शुक्रवारी (1 एप्रिल) अपडेट झाल्याच नव्हत्या. दुपार पाळीच्या तुलनेत सकाळ पाळीतील वाहकांना याचा अधिक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे वाहक प्रवाशांना जुन्या पद्धतीप्रमाणे वाढीव भाडेदराचे कागदी तिकीट देत होते. परिणामी, एकीकडे भाडे वाढीमुळे प्रवाशांचा रोष आणि दुसरीकडे तिकीट मशिनचा गोंधळ यामुळे वाहक वैतागले होते.
प्रवासी म्हणतात की…
70 रुपयांचा उपयोग ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत होता. तर दररोज ये-जा करणाऱ्यांसाठी मासिक पास उपयुक्त होता. प्रशासनाने थेट पास बंद करण्यापेक्षा पासेसच्या किमतीत काही अंशांनी वाढ करायला हवी होती. पास बंद करणे हा पर्याय नाही. याशिवाय भाडेदरात वाढ केल्याने प्रवाशांवर दुहेरी भार पडणार आहे, असे दत्तात्रय फडतरे यांनी सांगितले.
तर, एकदा बसचा पास काढल्यानंतर दिवसभर प्रवास करणे सोयीचे होते. आता पासेस बंद केल्यामुळे प्रत्येक वेळी नवीन तिकीट घ्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रवासाचा खर्च दुपटीने वाढणार आहे. याच तुलनेत आता बसेसची वाट पाहण्यापेक्षा एसटी किंवा खासगी वाहनांनी प्रवास करता येणार असल्याची प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने दिली.