सिंहगडरस्ता, दि. 2 (प्रतिनिधी) -राज्य सरकारने सर्व सामान्यांसाठी 100 रुपयांमध्ये “दिवाळी किट’ ही योजना सुरू केली होती. परंतु, दिवाळी झाली तरी अद्यापही सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना हे किट मिळालेलेच नाही. याबाबत दोन दिवसांत मिळेल, असे गेल्या महिनाभरापासून स्वस्त धान्य दुकानदार सांगत आहेत. तर, संबंधित खात्याचे मंत्री म्हणतात की, तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी असते. एकूणच राज्य शासनाची ही योजना सामान्य नागरिकांच्या तोंडाला पाने पुसल्याचीच ठरणार असल्याची चर्चा शिधापत्रिकाधारक नागरिकांमध्ये आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड, किरकटवाडी, धायरी परिसरातील स्वस्त धान्य दुकानांत “शासकीय दिवाळी किट’ अद्यापही उपलब्ध झालेले नाही. काही ठिकाणी किरकोळ शिधापत्रिका धारकांना ते अर्धवटच मिळाले आहे. डाळ आहे तर साखर नाही आणि रवा आहे तर तेल नाही, अशा प्रकारचा अनुभव काहींना आला आहे.
आम्ही पुणे शहरांमधील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना अशा दिवाळी किटचे वितरण केलेले आहे. एक-दोन दिवसांत नागरिकांना हे कीट उपलब्ध होतील. किट मधील सर्वच्या सर्व वस्तू उपलब्ध आहेत. नागरिकांनी आपापल्या भागातील दुकानात जाऊन शिधा घ्यावा.
– गजानन देशमुख, परिमंडळ अधिकारी, अन्न वितरण कार्यालय
शासनाने घोषणा केल्याप्रमाणे वेळेत दिवाळी शिधा किट मिळाले असते तर नागरिकांची दिवाळी आनंदात गेली असती. परंतु, दिवाळीनंतर आठ दिवस होऊनही किट उपलब्ध नाहीत. सामान्य नागरिकांनी दिवाळी काय शिमग्याला साजरी करायची का?
– महेश पोकळे, शिवसेना विभाग प्रमुख
दिवाळी झाली तरी आमच्या भागातील नागरिकांना शासकीय दिवाळी किट, शिधा उपलब्ध झालेला नाही. या भागात सर्वसामान्य नागरिक राहतात त्यांच्या भावनांशी शासनाने खेळ केला आहे, ही बाब योग्य नाही.
– हरीश मंडले,माजी सरपंच, किरकटवाडी