वाल्हे -परिसरात अवकाळी पावसाने, वादळी वाऱ्यासह मंगळवारी पुन्हा जोरदार हजेरी लावली. मंगळवारीसायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये अनेकांच्या घराचे, तसेच जनावरांच्या गोठ्याचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील वाल्हे बसस्थानक ते पोटोबा हॉटेल दरम्यान सात ते आठ झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
करोनाच्या संकटा विरुद्ध संपूर्ण जग लढा देत असतानाच, रविवारी व मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामध्ये अनेक शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान
झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उकाडा जाणवत असताना, मागील आठवड्यापासून ढगाळ वातावरण होते. अनेकांच्या शेतामधील काढलेले कांदे, भुईमूग आदी पिके पावसामुळे भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
तसेच आडाचीवाडी येथील अंजिर, सीताफळ, चिकू, लिंबू आदी फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ओला चारा मका, हात्ती घास, मेथीघास वादळी वाऱ्यांमुळे शेतामध्ये पडल्याने शेतकरीवर्गासमोर हिरव्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाले आहेत.
वाल्हे परिसरातील दिनेश कुंभार, बाळासाहेब भुजबळ, कैलास भुजबळ यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही जनावरांचे गोठे पडल्याने, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन, शेतामध्ये ही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.
त्यामुळे शेतीला तळ्याचे स्वरुप आले होते. वादळी वाऱ्यांमुळे महावितरणचे अनेक वीजखांब वाकल्याने, वाल्हे परिसरामधील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. अनेक ठिकाणी वीजतारा तुटून पडल्या होत्या.
शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी
पिकांसह घरे, गोठ्यांचे मोठे नुकसान ः सीताफळ, चिकू, लिंबू बागांनाही फटकाअवकाळी पाऊसामुळे अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अंजीराची अनेक झाडे मधूनच दुभागली आहेत. सीताफळांची फुले व फळे तुटून पडल्याने, तसेच झाडांना राहिलेली सीताफळे एकमेकांवर व फांदीवर घासून काळी पडणार असल्याने, त्या फळांची विक्री बाजारपेठत मातीमोल भावात होती.
त्यामुळे शेतकरीवर्गावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यामुळे शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी, येथील शेतकरी, सुर्यकांत पवार, संभाजी पवार, विलास पवार कैलास पवार, ओम पवार, काशिनाथ पवार,अक्षय पवार, निलेश पवार, प्रकाश पवार आदी शेकऱ्यांनी केली आहे.