मळणी, वाळवणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरा
वीसगाव खोरे – आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास शेतीमध्ये होत असल्याने कृषीसंस्कृतीत बदल होत असून, यंत्रसंस्कृती शेती कामात रुजली जात आहे. लवकर होणार्या कामांमुळे आधुनिक यंत्रांचा वापर वाढत असल्याने शेतातील पारंपरिक खळ्यासारखे गोष्टी आता लोप पावत चालल्या आहेत.
भोर तालुक्यातील वीसगाव खो-यातील धनावडेवाडी, वरवडी खुर्द, वरवडी बुद्रुक, वरवडी डायमुख, धावडी, बाजारवाडी, हातनोशी, बालवडी, निळकंठ, गोकवडी, पोळवाडी, जेधेवाडी, पळसोशी, उत्रौली,धावडी,नेरे,आंबाडे,कान्हवडी, मानकर वाडी, हातनोशी या परिसरात खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे, ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने भात कापणीपूर्वी भात मळणी, वाळवणी या करीता खळ बनविले जात होते. गेल्या काही वर्षांपर्यंत ग्रामीण भागात असे चित्र पाहावयास मिळत होते,
पाणी साठणार नाही अशा माळरानावर खळे तयार केले जात असे. खळ्याच्या जागेवरील गवत, खडे काढून जागा स्वच्छ करून खळ्याच्या मध्यभागी तिवडा ( लाकडी खांब) रोवून त्याच्याभोवती बैल फिरवून जमीन सपाट करून खळे शेणाने सारवून घेतले जात असे. त्यानंतर भात मळणीसाठी भाताचे भारे खळ्यावर आणून ठेवले जात. मळणी काढली जात असे. खळ्यात कापलेले भात पीक पसरून मळणी केली जात होती. पहाटे किंवा रात्री मध्यभागी रोवलेल्या तिवड्याभोवती बैल बांधले जायचे. ते खळ्यातील कापलेल्या भातावर तसेच ज्वारीच्या कणसांवर गोलाकार फिरत. बैलांच्या गोलाकार फिरण्याने धान्यांचे दाणे वेगळे झाले की भाताचा पेंढा वेगळा केल्यानंतर वाऱ्याच्या वेगानुसार उंचावर उभे राहत धान्य उफणले जायचे.
आता भात काढणीचे बहुतेक काम यंत्र, हार्वेस्टरने होऊ लागल्याने शेतकऱ्यांची श्रम करण्याची सवय कमी झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतातच प्लॅस्टिक कागदावर धान्य काढणीचे मळणी यंत्र आणून भात, ज्वारी, सोयाबीन, गहू, बाजरीची मळणी केली जाते. डोंगराळ भागात लोखंडी बॅरल अथवा कॉटवर भात पिकाची जोडणी करून रास तयार केली जाते. ग्रामीण भागातील शेतकरी हे मोठे ट्रॅक्टर, छोटे पॉवर ट्रॅक्टर, हार्वेस्टरच्या वापराने फाळनांगर, मोगना, कोळपे, वखर, नांगर, तिफन, लाकडी अवजारे पारंपरिक औजारे व साधने नामशेष झाली आहेत.
शेती कामाकरीता मजूर उपलब्ध होत नाहीत. अत्याधुनिक यांत्रिक साधनेमुळे वेळेची, श्रमाची बचत होते, तसेच शेतक-या कडील शेती भाव हिस्स्याने दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतक-यांना बैल सांभाळणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागात बैलजोड्या नगण्य स्वररूपात आहेत, त्याला पर्याय म्हणून यांत्रिक साधनांमुळे कमी मनुष्यबळात भात काढणी, मळणी होत असल्याने खळ काढणे बंद झाले आहे.
– महादेव मांढरे, प्रगशील शेतकरी, गोकवडी (ता. भोर)