त्रिभूज शेळके
पारगाव – राज्यातील 2369 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने गावकारभारी कामाला लागले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने दौंड तालुक्यातील पारगावमध्ये तिरंगी लढत होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालाचे दिवाळीच्या अगोदरच फटाके फुटणार असून लक्ष्मी पूजनाच्या अगोदरच लक्ष्मीचे दर्शन होणार आहे.
दौंड तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. त्यात पारगावसारख्या मोठ्या गावात सरपंचपद आरक्षण हे सर्वसाधारण पुरुष असल्याने तालुक्यात पारगावची ग्रामपंचायत निवडणूक ही अत्यंत चुरशीची व लक्षवेधी ठरणार आहे.
पारगावमध्ये आमदार कुल गटाचे एक पॅनल व माजी आमदार रमेश थोरात गटाचे दोन, असा तिरंगी सामना होणार असल्याचे चित्र जवळ जवळ स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या गोटातून सर्जेराव जेधे, माऊली ताकवणे, अरुण बोत्रे, तुकाराम ताकवणे, सुनील ताकवणे, मच्छिंद्र ताकवणे, रमेश बोत्रे, यापैकी सरपंच पदाचा उमेदवार असू शकतो. तर राष्ट्रवादीच्या एका गटाचे सरपंचपदाचे उमेदवार खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन सुभाष बोत्रे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सयाजी ताकवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे यापैकी उमेदवार असू शकतात, असे संकेत मिळत आहेत.
राष्ट्रवादीच्या दुसऱ्या पॅनलचे नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व पारगाव सोसायटीचे संचालक संभाजी ताकवणे हे करीत आहेत. ते स्वतः सरपंचपदाचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्यासोबत खरेदी विक्री संघाचे माजी संचालक बाळासाहेब ताकवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मोरे, विद्यमान सोसायटीचे संचालक महादेव डोंबाळे, माजी उपसरपंच सतीश ताकवणे, जिल्हा बॅंकेचे निवृत्त अधिकारी विजय चव्हाण आदी पदाधिकारी असल्याचे संभाजी ताकवणे यांनी सांगितले.
एक वर्षांपूर्वी संभाजी ताकवणे यांनी बंडखोरी करून सोसायटी निवडणुकीत अपक्ष निवडून येऊन आपला करिष्मा दाखविला होता. बाकी काही असो पण अनेक घडामोडीनंतर दि. 25 तारखेलाच खरे उमेदवार कोण, हे स्पष्ट होणार आहे.
साडेसहा हजार मतदार
पारगावचे एकूण मतदार 6 हजार 694 इतके असून 6 प्रभागांत 17 सदस्य व सरपंच निवड थेट जनतेतून आहे. अर्ज भरणे दि. 16 ते 20 ऑक्टोबर, छाननी 23, माघार व चिन्ह वाटप 25 ऑक्टोबर रोजी, मतदान दि. 5 नोव्हेंबर व निकाल दि. 6 नोव्हेंबर रोजी असा निवडणूक कार्यक्रम असल्याचे ग्रामविकास अधिकारी एम. टी. बडे यांनी सांगितले.
थेट निधीमुळे अनेक इच्छुक
वित्त आयोगाचा विविध प्रकारच्या कामांचा निधी हा थेट ग्रामपंचायतीला मिळत असल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषद यापेक्षा ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. चिन्ह आणि अर्ज माघारीनंतर मतदारराजाची सेवा चालू होणे अपेक्षित असताना मात्र, एक उमेदवाराने निवडणूक जाहीर होताच बिर्याणीचा बेत करून उमेदवारीची ललकारी दिली आहे. परंतु सदस्यपदाचे उमेदवार निवडण्यासाठी सर्वच पॅनल प्रमुखांची दमछाक होताना दिसत आहे. काही उमेदवारांच्या बाबतीत दबावतंत्र वापरले जात आहे.