वाल्ह्यात कोळी बांधवांचा रंगला मेळावा : काशीपूरला नेण्यासाठी प्रज्ज्वलित
वाल्हे – महर्षि वाल्मिकी ऋषींची संजीवनी समाधी मंदीर असलेल्या वाल्हे (ता.पुरंदर) येथे दरवर्षी कोजागरीच्या पौर्णिमेच्या दिवशी, महर्षि वाल्मिकी ऋषींचा जयंती सोहळा व कोळी बांधवांचा मेळावा, महाराष्ट्रातील अनेक कोळी बांधवाच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
यावेळी, महर्षि वाल्मिकी ऋषींच्या संजीवनी समाधीस पुजारी बबन महाराज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक करून, विधिवत पूजा करण्यात आली. महाराष्ट्र कोळी समाज संघाचे माजी अध्यक्ष स्व. अनंत तरे यांनी हा जयंती सोहळा सुरू केला असून त्यांची परंपरा जपत, त्यांचे सुपुत्र व महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष जयेश तरे यांनी हा जयंती सोहळा पुढे सुरू ठेवला आहे. दरम्यान, यावर्षी अनंत तरे फाऊंडेशन ठाणे सचिव मदन भोई व महाराष्ट्र कोळी समाज संघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा जयंती सोहळा पार पडला.
दरम्यान, पुणे जिल्हा बॅंकेचे अधक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते, माजी सभापती गिरीश पवार, सरपंच अतुल गायकवाड, अमोल खवले, दत्तात्रेय पवार, अनिल भुजबळ, हनुमंत पवार, बजरंग पवार, बाळासाहेब भुजबळ, मोहन पवार, मदन भुजबळ, विकास पवार, माणिक महाराज पवार, सचिन जाधव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महर्षि वाल्मिकी मंदिरातून सामदा काशीपूर (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथील आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषींचा मठ असलेल्या ठिकाणी नेण्यासाठी “ज्योत’ प्रज्ज्वलित करण्यात आली. तसेच बारामती तालुक्यातील होळ येथील तरुणांनीही “ज्योत’ वाल्हे येथून प्रज्ज्वलित करून नेली.