अंगावर धावून जात धक्काबुक्कीचा प्रकार : मतदारयाद्यांवरून वातावरण तापले
भवानीनगर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्यांवरून छत्रपती साखर कारखान्याचे संचालक मंडळ व विरोधकांमध्ये धक्काबुक्की होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन मोठा राडा झाला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर यांच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्र सरकारचे नवीन नियमावलीमध्ये बिगर ऊस उत्पादक सभासद, थकबाकीदार सभासद व अ. प. क. यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला असताना देखील कारखान्याच्या प्रशासनाने या लोकांचा मतदार यादीमध्ये जाणून-बुजून समाविष्ट करत असल्याने याला विरोध दर्शवत साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कृती समितीच्या वतीने श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील असलेल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.
तसेच काम बंद केल्याने छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक व विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होऊन धक्काबुक्की झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला. कार्यकारी संचालक यांना विरोधकांनी बाहेर बोलावले परंतु संचालक मंडळाने पुन्हा त्यांना आत बोलावून जो काही प्रश्न असेल तो अंतर्गत कारखान्यांमध्ये मिटवला जाईल, अशी भूमिका घेतली.
कारखान्याने नवीन कायद्यानुसार मतदार याद्या प्रादेशिक सहसंचालकाकडे दिलेल्या आहेत. यामध्ये कोणत्याही संचालकाने प्रेशर आणलेला नाही. परंतु विनाकारण विरोधक बदनाम करण्याचे काम करत आहेत. असाही आरोप संचालकांनी यावेळी केला.
हरकत असल्यास न्यायालयात त्यांनी जावे – ऍड. निंबाळकर
भवानीनगर – छत्रपती कारखान्या इलेक्शन 2020मध्ये लागले. ज्या प्रारुप मतदार याद्या होत्या त्यावेळच्या कायद्याप्रमाणे पोटनियमाप्रमाणे छत्रपती साखर कारखान्याने दिल्या होत्या. त्याला काही सभासदांनी विरोध केला, हरकती घेतल्या. उच्च न्यायालयात गेले. 2023ला न्यायालयाने निकाल वाचून निवडणूक घेण्यास सांगितले. त्यावेळी नवीन कायद्यानुसार नवीन मतदार याद्या त्या पद्धतीने दिल्या जर यावर हरकत असेल तर कायद्याप्रमाणे उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात प्रश्न उपस्थित करायचा; दबाव टाकू नये, असे मत कारखाना संचालक ऍड. रणजीत निंबाळकर यशांनी व्यक्त केले.
ऍड. निंबाळकर म्हणाले, कारखान्याच्या कामगारावर प्रशासनावर दबाव निर्माण करायचा हार्वेस्टर व वाहतुकीचे करार चालू असताना त्यातील काही ट्रॅक्टर धारकांना पळवून लावायचे छत्रपती सहकारी साखर कारखान्याला बॅंकेकडून कर्ज उपलब्ध होऊ नये यासाठी पत्र द्यायचे असे योग्य आहे का? पुढील काळात साखर कारखाना तुमच्याकडे आला तर तुम्ही स्वतः ऊस तोडायला जाणार आहात का?
यासाठी यंत्रणा उभी केली पाहिजे.
सहकार कायद्यानुसार ज्या मतदार याद्या पाठवायला पाहिजे होत्या, त्या पद्धतीने पाठवल्या आहेत. याबाबत कोणत्याही संचालकांनी कसलाही प्रेशर आणलेला नाही; परंतु विनाकारण कारखान्याच्या संचालक मंडळाला बदनाम करण्याचे काम केले जात आहे असा आरोप ऍड. निंबाळकर यांनी केला आहे.