मीना खोरे संघर्ष समितीचा इशारा : तहसील कार्यालयावर उपोषण
सावरगाव – मीना खोऱ्यातील पाण्यापासून वंचित 10 ते 12 गावांच्या पाणी प्रश्नांसाठी 32 वर्षांच्या लढ्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण जुन्नर येथील तहसील कार्यालयासमोर (दि. 31) सकाळी सुरु झाले. यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी, विविध गावांतील सरपंच व सर्वच राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, 15 ऑगस्टपर्यंत निर्णय झाला नाही तर आम्ही सर्वजण स्वातंत्रदिनीच सावरगावच्या मिना नदीत जलसमाधी घेणार आहोत. त्यामुळे सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा ही विनंती शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला. निमदरी खिलारवाडी, सावरगाव व वाड्यावरील शेतकरी गावबंद करून उपोषणात सहभागी झाले. माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासमवेत बैठक लावून हा प्रश्न सोडविला जाईल.
एकाही शेतकऱ्याला 15 ऑगस्ट रोजी जलसमाधी घेण्याची वेळ मी येवू देणार नाही, असे त्यांनी नमूद केले. “विघ्नहर’चे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर, नायब तहसीलदार सारिका रासकर, पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप पर्वत उपस्थित होते.
या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी वडज उजवा कालवा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जलसंपदा मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याबरोबर मीनाखोरे संघर्ष समितीचे पाच सहा प्रमुख सदस्यांची बैठक मंत्रालयात आयोजित करून हा प्रश्न लवकरच निकाली काढण्यासाठी आमदार अतुल बेनके व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रयत्न करणार आहे.
– अमित बेनके, युवा नेते,राष्ट्रवादी
आजच्या मीना खोरे संघर्ष कृती समितीच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास 10 ते 12 गावांनी आम्हाला जाहिर पाठींबा देत संपूर्ण गावे बंद करून लहान मोठ्या सह हजारों शेतकरी बांधव हे उपोषणत सहभागी झाल्याने हा प्रश्न आता लवकरच मार्गी लागेल. वरिष्ठ कार्यकारी अभियंता राजेंद्र तोडपकर यांच्या विनंतीमुळे हे उपोषण आम्ही सर्वजण मागे घेत आहोत.
– प्रशांत पाबळे, सचिव, मीना खोरे संघर्ष कृती समिती
आमदार बेनकेंचे नाव न घेता टीका
आमदार अतुल बेनके यांचे नाव न घेता भाजप नेत्या आशा बुचके म्हणाल्या की, तुमच्या घराण्याकडे अनेक वर्षे कृष्णा खोरे महामंडळाचे पद असताना तुम्ही या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. न्याय दिला नाही. आत्ता भाजपा शिवसेना सरकार हे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे त्यांनी नमूद केले.