सूर्य आक ओकत असल्याने पिके जगवण्यासाठी धडपड
भवानीनगर : कडक उन्हाळा सुरू असून देखील नीरा डाव्या कालव्याला आवर्तन सुरू असल्याने सध्या तरी इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील पिके या पाण्यामुळे तग धरून आहेत. परंतु अजून पुढील एक महिना उन्हाळा अतिशय कडक असल्याने शेतकर्यांना शेतातील पिकांना जगवण्याची भीती लागून राहिली आहे.
दरवर्षीपेक्षा यावर्षीच्या उन्हाची तीव्रता अधिक असल्याने नागरिक मात्र पूर्णपणे हैराण झाले आहेत. त्याचबरोबर जनावरांचे व पशु पक्षांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. ज्या शेतकर्यांनी नीरा डाव्या कालव्यावरून माळरानावरती उचल पाणी नेले आहे त्या शेतकर्यांचे माळरानावरील शेती सध्या तरी चांगल्या प्रकारे टिकत आहे; परंतु कालव्याचे आवर्तन थांबले तर या पाण्यावर असणारे शेती सुद्धा पूर्णपणे संपणार आहे.
शेतकरी जी शेतातील पिके आहेत ती टिकवण्यासाठी धडपड करीत आहेत. शेतातील पिकांना पाणी मिळण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. काही शेतकर्यांना पाण्याची मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याने जनावरांना देखील चारा उपलब्ध होत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान, नीरा डाव्या कालव्याच्या बाजूची शेती जरी ही हिरवी दिसत असली तरी नीरा डाव्या कालव्याच्या अंतरावर असणार्या शेतकर्यांच्या शेतातील पिके करपू लागली आहेत.