नारायणगाव (ता. जुन्नर) : ग्रामस्थांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे यांना निवेदन देण्यात आले.
नारायणगाव – येथे दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करून अनधिकृत राहत असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून एक फरार झाला आहे. त्यामुळे नारायणगाव सुरक्षित आहे का? अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होऊ लागली आहे.
दहशतवादी विरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर नारायणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये बेकायदा राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांनी नारायणगाव येथे कॅम्प सुरू असताना सरपंच यांचा दाखला घेऊन आधार कार्ड बनविले असल्याचे नमूद करण्यात आले.
बांगलादेश ते भारत प्रवास करताना त्यांच्याकडे कुठलेही प्रवासी कागदपत्र नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे घुसखोर बांगलादेशी असून अवैधरित्या नारायणगाव येथे वास्तव्य करीत असल्याचे लक्षात आले आहे. दहशतवादी विरोधी पथकाने नारायणगाव पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील संपूर्ण तपासाची कारवाई नारायणगाव पोलिसांना करायची असल्याने नारायणगाव ग्रामस्थांच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक विनोद धुर्वे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनानुसार पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरातील वास्तव्यास असणार्या परदेशी नागरिकांचा तपास करून त्यांना दिलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखले, रेशन कार्ड, मतदान कार्ड, बोगस प्रमाणपत्र, शासकीय योजनांचा लाभ बेकायदा व बोगस दिले असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण कागदपत्र कोणत्या कार्यालयामार्फत दिली गेली याचा शोध घेऊन संबंधित कृत्य करणार्या व्यक्ती, पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून नारायणगाव भयमुक्त करावे असे म्हटले आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहे.