चिंबळी- मावळ पाणलोट आणि लाभक्षेत्रात दमदार परिसरातही पावसाच्या सरी बरसत असल्याने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहत असलेल्या इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्याने इंद्रायणी नदीने काठ सोडला आहे. तर नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेली महिनाभरापासून दडी मारलेल्या वरुणराजाने गेल्या तीन दिवसांपासून हजेरी लावली आहे. दरम्यान, गेली आठ महिन्यांपासून पिंपरी-चिंचवडचे गटाराचे पाणी पवित्र अशा इंद्रायणी नदीतून वाहत असल्याने नदीपात्राला गंटारगंगेचे स्वरुप आले होते त्याचबरोबर जलपर्णीचाही विळखा होता;
मात्र इंद्रायणी नदीने आता काठ सोडल्याने नदीपात्रातील जलपर्णीसह इतर घाण वाहून गेल्याने इंद्रायणी नदीने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.
इंद्रायणीच्या पाणीपात्रात सतत वाढ होत असून इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर राहणाऱ्या नागरिकांना आळंदी पोलीस ठाण्याच्या वतीने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.